नाशिक : पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणात पाण्याची आवक वाढली असून, जलस्तर नियंत्रित ठेवण्यासाठी सोमवारी (दि. 23) रोजी धरणातून सहा हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडल्याने रामकुंड परिसर पुन्हा एकदा पूर पाण्यात गेला आहे. तर दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले आहे.  (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Godavari Flood | गोदेला पूर; दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी

नदीचा जलस्तर मोठ्या प्रमाणात वाढ होणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाची संततधार कायम असल्याने गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी, सोमवारी (दि.23 ) दुपारी 2 वाजता या धरणातून 6 हजार 160 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरीला हंगामात दुसर्‍यांदा पूर आला आहे. नदीचा जलस्तर मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याने नागरिकांनी सुरक्षेसंबंधी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यात सर्वदूर पर्जन्यवृष्टी होत असल्याने धरणांच्या पाण्याच्या पातळीत समाधानकारक वाढ होऊ लागली आहे. परिणामी, अपवाद वगळता सर्वच धरणांतून विसर्ग करण्यात येत आहे. गंगापूर धरणातील जलसाठा ६१.८७ टक्क्यांवर गेल्याने शुक्रवारपासून धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. हा विसर्ग सोमवारी दुपारी २ पासून 6,160 क्यूसेक वेगाने केला गेला. त्यामुळे गोदावरीला पुन्हा पूर वाहू लागला आहे.

गेल्या आठवड्यात, दि. 20 जूनपासून धरणातून कमी-अधिक प्रमाणात विसर्ग होत आहे. शुक्रवारी प्रथम 1160 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. तर शनिवारी (दि. 21) वेग वाढवून 2 हजार 320 करण्यात आला. त्र्यंबक आणि नाशिकमध्ये पावसाची संततधार कायम असल्याने पुन्हा एकदा रविवारी विसर्ग 3 हजार 944 क्यूसेकवर नेण्यात आला. पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक लक्षात घेता सोमवारी (दि. २३) पुन्हा एकदा विसर्ग वाढविण्यात आला. सध्या 6 हजार 160 क्यूसेक वेगाने धरणातून पाणी सोडले जात असल्याने गोदा काठाला पुन्हा पुराचा तडाखा बसला आहे.

गंगापूर धरण समूहातील पाणलोट क्षेत्रात होणारे पर्जन्य आणि धरणात येणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविला जाणार आहे. त्यामुळे कुणीही नदीपात्रात जाऊ नये. तसेच नदीकाठालगतचे आपले पशुधन, चीजवस्तू, विद्युत पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन नाशिक पाटंबधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे.

सोमेश्वर धबधबा खळाळून वाहतोय

नेहमी शांत आणि मनमोहक दिसणारा सोमेश्वर धबधबा आता खळाळून वाहतो आहे. हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र, धबधब्याचा वाढता प्रवाह आणि पाण्याचा वेग पाहता, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. सुरक्षा रक्षकांकडून पर्यटकांना सुरक्षित अंतरावर थांबण्याचे आणि सेल्फीच्या मोहात न पडण्याचे आवाहन वेळोवेळी केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT