घोटी : पुढारी वृत्तसेवा
यंदाच्या खरीप हंगामाच्या नियोजनासाठी मशागतीच्या तयारीसाठी शेतकऱ्याची लगबग सुरू झाली आहे. शेतीसाठी लागणारे नांगर, वखर, सारायंत्र, तिफण, पांबर, कोळप आदी पारंपरिक अवजारे कुशल कारागिरांकडून बनवले जात आहेत. कमी पर्जन्यमानाच्या प्रतिकूल वातावरणातही हंगामाच्या पूर्वतयारीला मात्र वेग आला आहे.
पावसाचे आगमन दिलासादायक झाले असल्याने शेतकरी पारंपरिक अवजारे कारागिरांकडून बनवून घेतात. मात्र, महागाईमुळे अवजारांना दोन ते अडीच हजार रुपये खर्च येत असल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारी नाही. तरीदेखील ते खरेदी करीत आहे. ट्रॅक्टरच्या माध्यमातून मशागत करण्यासाठी तीन ते पाच हजार रुपये भाव एकरला मोजावे लागत आहेत.
इगतपुरी तालुक्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील १३० गावे खरीप हंगामासाठी निश्चित केली असली तरी अधिकाऱ्यांनी खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे. महसुली गावांमध्ये अनेक शेतकरी पावसाळ्यात भात लागवड करतात. यंदा एल निनोमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही शेतकऱ्याकडे जमीन दुरुस्ती, मशागतीसाठी पैसेच शिल्लक नसल्याने ते आता हवालदिल झाले आहेत.
अशातच खरीपपूर्व मशागतीसाठी असणाऱ्या अवजारांना बाजारात प्रचंड मागणी वाढली आहे. अद्याप हवा तसा पाऊस नसल्याने पिण्यासाठी पाणी आणि जनावरांसाठी चारा मिळावा यासाठी शेतकऱ्याची भटकंती सुरू आहे. यंदा घेतलेली रब्बी पिके हाती लागली नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. खरीप पेरणीसाठी पैसाच उपलब्ध नसल्याने गरीब शेतकरी सैरभैर झाले आहेत.
दर्जेदार बियाणे पुरवठ्याची अपेक्षा
शेतकऱ्यांनी शासनाकडे दर्जेदार बियाणे, शेती अवजारांसाठी मदत, रब्बी हंगामातील नुकसानीची भरपाई आणि खरीप हंगामासाठी आर्थिक सहाय्य तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच मागील वर्षी निकृष्ट व भेसळयुक्त बियाण्यांमुळे मोठे नुकसान झाल्याने यंदा दर्जेदार बियाण्यांचा पुरवठा करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.