नाशिक महापालिका Pudhari Photo
नाशिक

Nashik Municipal Corporation| माजी महापौरांचा आयुक्तांना अल्टिमेटम

Nashik Municipal Corporation| आठ दिवसांमध्ये मनपाचे कामकाज न सुधारल्यास मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे बदलीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आपण केवळ पंचवटीतील पब्लिक ॲमिनिटी आरक्षण बदलाच्या महापालिका प्रशासनाच्या प्रक्रियेस हरकत घेतली होती. परंतु आयुक्त मनीषा खत्री यांनी आपल्यावर मंदिर पाडण्याची मागणी केल्याचा खोटा आरोप करून प्रशासकीय संहितेचा भंग केला, असा दावा करीत माजी महापौर दशरथ पाटील यांनी आयुक्त खत्री यांना अल्टिमेटम दिला आहे.

येत्या आठवडाभरात खत्री यांच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास त्यांच्या बदलीची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे केली जाईल, असा इशारा पाटील यांनी दिला. पंचवटीमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या सिंहस्थ धर्मध्वजारोहण नियोजन बैठकीदरम्यान माजी महापौर पाटील आणि आयुक्त खत्री यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती.

पाटील यांनी कुंभमेळ्याच्या नियोजित कामांच्या दिरंगाईबाबत प्रशासनावर टीका केल्यानंतर आयुक्त खत्री यांनी त्यांच्यावर पलटवार करीत पाटील यांनी मंदिर तोडण्यासाठी पत्र दिल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यावरून पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आयुक्तांवर गंभीर आरोप केले आहेत.

पाटील म्हणाले की, पंचवटीतील सर्व्हे क्रमांक २९४ व २९५ पैकी जागेवरील पब्लिक ॲमिनिटीचे आरक्षण बदलून रहिवाशी क्षेत्रात समाविष्ट करण्याच्या प्रशासन प्रक्रियेला आपण दि. ११ एप्रिल २०२५ रोजीच्या पत्राद्वारे हरकत घेतली होती. मंदिर तोडण्याची कुठलीही मागणी केली नव्हती. मात्र आयुक्तांनी राजकीय विरोधकांसारखी भूमिका घेत आरोप करून प्रशासकीय संहिता मोडली.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमध्ये अक्षम्य दिरंगाई सुरू असताना त्यासंदर्भात तक्रार करणाऱ्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न आयुक्तांकडून सुरू आहे. सिंहस्थ कामांमध्ये चूक दाखविल्यास नाव बदलण्याची राजकीय भाषा आयुक्तांसारख्या संवैधानिक पदावरील अधिकाऱ्यांकडून शोभनीय नाही.

सिंहस्थकामे जनतेच्या कररुपी निधीतून गोळा झालेल्या शासकीय निधीतून होत आहेत. त्या निधीचा अपव्यय होत असेल, तर त्यावर जनतेला आवाज उठवावाच लागेल, असे नमूद करीत आयुक्तांनी दिलेले आव्हान स्वीकारल्याचे पाटील यांनी जाहीर केले.

आयुक्तांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा (चौकट)

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांना महापालिका जबाबदार आहे. यापुढील काळात खड्ड्यांमुळे एकही बळी गेल्यास जोपर्यंत आयुक्तांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आपण पोलिस ठाण्यातून हलणार नाही, असा इशारादेखील माजी महापौर पाटील यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT