नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिक विभागातील बहुचर्चित बोगस शालार्थ आयडी प्रकरणाच्या अंतिम तपासणीला वेग आला असून, आडगाव येथील विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयात ५० अधिकाऱ्यांची नऊ पथके तपासणी करत आहेत. प्रत्येक पथकावर उपसंचालक दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात आल्याने संपूर्ण प्रक्रिया त्यांच्या निगराणीत पार पडत आहे.
दररोज सुमारे ३०० शिक्षकांची माहिती संकलित करत त्यांची विचारपूस केली जात असल्याची माहिती उच्च माध्यमिक विभागाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली. या प्रकरणाची विभागीय स्तरावर गेल्या काही महिन्यांपासून सखोल चौकशी सुरू आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती शिक्षण मंडळ कार्यालयात दिसून येत आहे.
गुरुवारपासून सुरू झालेली सुनावणी रात्री उशिरापर्यंत चालली असून, पुढील दोन दिवस तपासणी प्रक्रिया सुरू राहणार आहे. आवश्यक असल्यास रविवारी सुनावणी घेण्यात येणार असल्याचे पालकर यांनी स्पष्ट केले.
नाशिक विभागातील खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील तब्बल ८९२ कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी शासकीय नोंदीतील जावक क्रमांकाशी जुळत नसल्याचे चौकशीत समोर आले होते. त्यामुळे शालार्थ प्रणालीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याने मान्यता प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त केला होता.
त्यामुळे यापुढील सर्व मान्यता योग्य पद्धतीने होतील का, असादेखील सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, यापूर्वी झालेल्या सुनावण्यांनंतर ठोस कारवाई न झाल्याने संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे या अंतिम तपासणीनंतर दोषींवर नेमकी कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी सकाळी ११ पासून होणारी सुनावणी निर्णायक मानली जात आहे.
शिक्षकांचे हाल
आडगाव येथील शिक्षण मंडळ कार्यालय शहराच्या टोकाला असल्याने या ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीची अपुरी सुविधा शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. बससेवा नसल्याने अनेकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. सुनावणीच्या ठिकाणी बसण्याचीही पुरेशी व्यवस्था नसल्याने शिक्षक पायऱ्यांवर मिळेल त्या ठिकाणी आपला ठिय्या मांडत आहे. ठिकठिकाणी घोळके करून शिक्षक उभे राहून दिवस पार असल्याने शिक्षकांचे हाल होत आहेत, अशी माहिती उपस्थित शिक्षकांनी दिली.
सध्या कायदेशीर 66 बाबींची तपासणी सुरू आहे. तीन दिवस सुनावणी चालणार असून, काही शिक्षक शिल्लक राहिल्यास रविवारीही प्रक्रिया सुरू ठेवली जाईल. सर्व माहिती प्राप्त झाल्यानंतर शासन नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.- डॉ. महेश पालकर, संचालक, उच्च माध्यमिक