

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेची पाळेमुळे खोलवर रुतलेली असल्याची बाब मागील सव्वादोन महिन्यांपासून सातत्याने समोर येत आहे. संपूर्ण देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर राज्यातील तब्बल ५० भोंदूंचे दरबार उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे धार्मिक नगरी असलेल्या नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक पाच भोंदूंवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राज्यातील ५० प्रकरणांपैकी बहुतांश प्रकरणांत महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले आहे. भोंदू खरात प्रकरणानंतर पीडिता स्वतःहून पुढे येत असल्यामुळे या भोंदूंच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना बळ मिळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी उत्स्फूर्त, तर काही ठिकाणी अंनिसच्या प्रयत्नांनी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे सर्वच धर्मांतील हे भोंदू असून, अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केवळ हिंदू धर्मातच केले जाते, या सनातनी आरोपाला पुन्हा एकदा सणसणीत उत्तर मिळाले आहे. भोंदू बाबांनी ग्रामीण भागासह व शहरी भागातील महिला व पुरुषांचीही फसवणूक केल्याचे या घटनांवरून उघड झाले आहे.
विशेषतः यात महिलांवरील शारीरिक शोषणासह आर्थिक लुटीचे प्रमाण अधिक आहे. भीतीपोटी व सामाजिक प्रतिष्ठेपोटी अनेक पीडित समोर येण्यास घाबरत होते. मात्र, आता पीडित स्वतःहून पुढे येत असल्यामुळे आणखी भोंदूचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्राला भोंदूंनी ग्रासले असून, या भोंदूंना बळी पडलेल्यांनी पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, बुवाबाजी संघर्ष विभागाच्या कार्यवाह अॅड. रंजना गवांदे व सहकार्यवाह विष्णुदास लोणारे यांनी केले आहे. राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी ही गुन्ह्यांची यादी संकलित केली आहे.
या भोंदूंवर गुन्हे दाखल
अशोक खरात (नाशिक), विठोबा वाल्मीक जाट सातपूर (नाशिक), महेश काकडे लासलगाव (ता. निफाड), चंद्रकांत राजेंद्र माळी - इगतपुरी (नाशिक), कमलेश महाराज अधिकारी इंदिरानगर (नाशिक), राजेंद्र गडगे संगमनेर (अहिल्यानगर), यशवंत एकनाथ थोरात पारनेर (अहिल्यानगर), गणेश शिंदे श्रीरामपूर (अहिल्यानगर), राजू बन्सी दिवटे - पारनेर (अहिल्यानगर), शिवभाऊ सोनवणे सर्जेपुरा (अहिल्यानगर), अशोक मधुकर आढाव -श्रीरामपूर (अहिल्यानगर), हृषिकेश वैद्य वसई (मुंबई), अल्ताफ रईस खान मालाड (मुंबई), रिधम पांचाळ -मालाड (मुंबई), रमेश गुप्ता मालाड (मुंबई), शाहीद शेख खडकपाडा (कल्याण), मंजुनाथ शेट्टी (ठाणे), अर्जुन चव्हाण उर्फ टणटण बाबा नवी मुंबई, किसन तळपे मंदोशी (खेड), अब्दुल रशीद शेख - खालापूर (रायगड), इरफान नियाज अहमद कांदिवली (मुंबई), शिवराम पराश सावर (पालघर), अल्ताफ हसन मदारी (जळगाव), नाना महाराज उर्फ गुरुमाउली वीरकर टेंभुर्णी (सोलापूर), मोहन भोसले कुडूवाडी (सोलापूर), पिंटू धुमाळ - बारामती (पुणे), नाना बर्डे आळे फाटा (पुणे), श्याम महाराज राठोड दिवी (पुणे), अनिल सोलोमन सिंग (पुणे), पंकज देवराम घोलप येडगाव (पुणे), प्रमोद बाळू गायकवाड उत्तमनगर (पुणे), शीतल सालके व पौर्णिमा सारस्वत (पुणे), औदुंबर गडदे स्वारगेट (पुणे), नवनाथ गवळी खेड (पुणे), परवेज अब्दुल अजीज मेमन - कोंढवा (पुणे), हेमदास किसन बावणे अड्याळ (भंडारा), हरिगिरी दत्तगिरी महाराज - भाग्यनगर (नांदेड), ज्ञानेश्वर नागोराव कोरडे - बिलोली (नांदेड), कृष्णा उर्फ सुभाष चित्ते प. देवपूर (धुळे), योगेश बापू खैरनार -निजामपूर (धुळे), ताहीर रशीद बेग सक्करदरा (नागपूर), सुधाकर रमेश काळे अंजनगाव सुर्जी (अमरावती), अशोक रामधन राठोड - वडगाव (यवतमाळ), विठ्ठल पवार महागाव (यवतमाळ), महेश मोहन बाबर - विटा (सांगली), गंगाधर बुरांडे सावली (चंद्रपूर), भीमराव पुंजाराम बिहाडे (छत्रपती संभाजीनगर), मुक्तानंदगिरी महाराज - कन्नड (छत्रपती संभाजीनगर), चेतन सुनील माळी मूर्तिजापूर (अकोला), सुधाकर गाडगे - बाळापूर (अकोला)