नाशिक : शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना एकत्रितच होती. त्यामुळे कोण एकत्रित येणार यापेक्षा आपला पक्ष मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. घोडा मैदान जवळच आहे. निवडणुकीत ताकद कोणाची ते दिसेलच, अशा शब्दांत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला आहे.
एनडीएसोबत राहण्याचा आमचा पक्का निर्धार असून, आमच्या विचारधारा ज्यांना मान्य असतील, ते सोबत येऊ शकतात, असे सूचक विधान करत पवार कुटुंबाच्या एकत्रीकरणावर त्यांनी भाष्य केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका एकत्रित लढण्याबाबत महायुतीच्या समन्वय समितीमध्ये चर्चा झाल्याचा दावाही तटकरे यांनी केला.
महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी उत्तर महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. जळगाव, नंदुरबार व धुळे येथील बैठकांनंतर त्यांनी शनिवारी (दि.५) नाशिकमध्ये राष्ट्रवादी भवन येथे बैठक घेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी हितगुज साधले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना तटकरे यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या शक्यतेवर भाष्य केले. ते म्हणाले की, एनडीएसमवेत जाण्याविषयी यापूर्वीही आमची भूमिका होती. आजही तीच कायम आहे.
आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणूक एकत्रित लढविण्याविषयी समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा झाली असली, तरी अद्याप त्यावर अंतिम निर्णय होणे बाकी आहे. निवडणूक काळापर्यंत काय स्थिती असेल, यावर बरेच काही अवलंबून असेल. मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले. एकट्या नाशिकमधून पक्षाचे सात आमदार निवडून आले आहेत. संख्याबळ पाहता, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत अधिकाधिक जागा मिळाव्यात, अशा स्वरूपाच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. यामुळे त्याचा निश्चितच विचार करून कार्यकर्त्याला न्याय दिला जाईल, असे तटकरे यांनी सांगितले. याप्रसंगी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, माजी खासदार समीर भुजबळ, आ. पंकज भुजबळ, सरोज आहिरे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगारे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, विष्णुपंत म्हैसधुणे, प्रेरणा बलकवडे आदी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत पक्षाचा राजीनामा दिलेले माजी खासदार समीर भुजबळ यांची पक्षातील सध्याची भूमिका काय असा प्रश्न विचारला असता, तटकरे यांनी समीर भुजबळ यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. समीर भुजबळ यांच्याकडे पक्ष संघटन बळकट करण्यासाठीचे उत्तम नेतृत्व आहे. ते हार्डवर्कर असून, कोणताही कार्यक्रमाचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी ते 'ग्रेट शो मॅन' म्हणून ओळखले जातात, असे नमूद करत पक्षाला अशा नेतृत्वाची गरज असल्याने येत्या काळात त्यांच्यावर पक्ष जबाबदारी देणार असल्याचे तटकरे म्हणाले.
नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पक्षाची ताकद असली, तरी शहरात मात्र संघटना कमकुवत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात विशेष लक्ष देण्याची सूचना पदाधिकाऱ्यांना दिली आहे. त्यानुसार सभासद नोंदणी करण्यात येत आहे. भुजातील बळ बाहेर पडले, तर शहरातही संघटना मोठी होईल, असे नमूद करत शहरात अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी भुजबळांना सूचना करण्यात आल्याचे तटकरे यांनी सांगितले.