सटाणा/जायखेडा : पुढारी वृत्तसेवा
बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथे अल्पभूधारक शेतकरी दाम्पत्यावर संशयित विषबाधेचे दुर्दैवी संकट ओढवले. दिवसभर शेतीची कामे आटोपल्यानंतर रात्री कुटुंबासमवेत मटणाचे जेवण आणि त्यानंतर दही खाल्ल्यानंतर दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. उपचारासाठी नामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर द्वारकाबाई शांताराम ह्याळीज (६८) यांचा मृत्यू झाला, तर पती शांताराम नानाजी ह्याळीज (७८) यांच्यावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, ते मृत्यूशी झुंज देत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आखतवाडे गावाजवळील शेतात वास्तव्यास असलेले अल्पभूधारक शेतकरी शांताराम ह्याळीज यांनी शनिवारी (दि. २७) दिवसभर शेतीची कामे केली. रात्री कुटुंबासमवेत मटणाचे जेवण केल्यानंतर त्यांनी दही खाल्ले. काही वेळातच दोघांनाही उलट्या, चक्कर व अस्वस्थता जाणवू लागल्यामुळे मुलगा आधार ह्याळीज यांनी त्यांना तातडीने नामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर द्वारकाबाई ह्याळीज यांची प्रकृती झपाट्याने खालावली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरू केले; मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शांताराम ह्याळीज यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
द्वारकाबाई ह्याळीज यांचे शवविच्छेदन नामपूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. त्यानंतर दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात आखतवाडे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलि ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून अन्नपदार्थांसह आवश्यक नमुने ज केले. या घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून नेमक विषबाधा कशामुळे झाली, याबाबत अद्याप कोणताह अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही.
व्हिसेरा तपासणीसाठी पुण्याला
द्वारकाबाई ह्याळीज यांचा व्हिसेरा राखून पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती नामपूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील मोराणकर यांनी दिली.