नाशिक : पुढारी वृत्तसेवा
द्वारका चौकात भुयारी मार्गाच्या कामामुळे बंद असलेला मुंबई-मालेगाव मार्ग रविवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यापूर्वी मालेगाव-मुंबई मार्ग बंद करण्यात आला होता. त्यामुळे द्वारका परिसरातील दोन्ही बाजूंचे मार्ग खुले झाल्याने वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मात्र, या चौकातील भुयारी मार्गाचे काम अद्याप सुरू असल्याने शालिमारकडून नाशिकरोडकडे जाणारा मार्ग पूर्णपणे खुला होण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मुंबई-मालेगाव हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यास हिरवा कंदील मिळाल्यानंतर रविवारी सकाळी तो सुरू करण्यात आला.
गेल्या महिन्यात पाहणीदरम्यान महिनाअखेरपर्यंत मार्ग खुला करण्याच्या सूचना कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी केल्या होत्या. त्यानुसार द्वारका चौकातील कामाला वेग देण्यात आला. दरम्यान, भुयारी मार्गाचे काम निर्धारित ११ महिन्यांच्या मुदतीत पूर्ण होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
महावितरण आणि महापालिकेची काही कामे तसेच खडक आणि पाण्याच्या पातळीमुळे कामाला विलंब होत आहे. सात महिने उलटूनही ५० टक्केच काम पूर्ण झाल्याचे चित्र आहे. कुंभमेळ्यापूर्वी हा मार्ग पूर्णपणे खुला करण्यासाठी कामाचा वेग वाढवण्याची गरज आहे.
द्वारका चौकातील दोन्ही मार्ग सुरू झाले असले तरी नाशिककडून नाशिकरोड रेल्वेस्थानकाकडे जाणारा मार्ग अद्याप पूर्णपणे खुला झालेला नाही. त्यामुळे वाहनचालकांना पखाल रोड मार्गाने जावे लागत आहे. हा मार्ग अरुंद असल्याने वाहतूक कोंडीचा मोठा त्रास वाहनचालकांना होत आहे.
द्वारका चौकातील भुयारी मार्गाच्या कामाचा फटका परिसरातील व्यापाऱ्यांना बसला आहे. रस्ते बंद असल्याने अनेक दुकानांपर्यंत ग्राहक पोहोचत नसल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे. भाड्याच्या दुकानांचे भाडे आणि इतर खर्च भागवणेही व्यावसायिकांसाठी आव्हान ठरत आहे.
मुंबई, पुणे आणि मालेगावकडून येणाऱ्या भाविकांना द्वारका-शिवाजीनगरमार्गे जुने नाशिक काठडावरून गोदाघाटाकडे जाने सोयीचे होते. मात्र, हा मार्ग अद्याप बंद असल्याने भाविकांना शहरातील पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे वेळ आणि अंतर दोन्ही वाढत आहे.
द्वारका चौकातील दोन्ही मार्ग सुरू झाल्याने वडाळा नाका चौफुलीवर चारी दिशांनी वाहनांची गर्दी वाढली आहे. शालिमारकडून येणारी वाहतूक तसेच मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहनांमुळे येथे वारंवार कोंडीत वाढ झाली आहे.
त्यामुळे वाहतूक नियोजन आणि पोलिसांची अतिरिक्त व्यवस्था करण्याची गरज आहे. द्वारका उड्डाणपुलावर इंटरनेट आणि केबल टीव्हीच्या अनेक फायबर केबल लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे अडथळा निर्माण होत आहे.