नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दिंडोरी तालुक्यातील शिवाजीनगर परिसरात कार अपघातात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या 9 जणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मंजूर करण्यात आली.
प्रत्येक कुटुंबास ५ लाख रुपये याप्रमाणे एकूण ४५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख डॉ. चैतन्य बैरागी यांनी दिली आहे.
या दुर्घटनेत दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील सुनील दरगोडे (३५), रेश्मा दरगोडे (३३), आर्या दरगोडे (३५), मृदुल दरगोडे (१५), श्रेयस दरगोडे (१२), श्रद्धा दरगोडे (१०), श्रावणी दरगोडे (११), गुणवती दरगोडे (९) आणि आयुषी दरगोडे (१३) यांचा समावेश आहे.
मदतीची रक्कम तहसीलदार, दिंडोरी यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, दिंडोरी शाखेतील खात्यात वर्ग करण्यात येणार असून, संबंधित कुटुंबीयांच्या बँक खात्यात ती जमा करण्याबाबत बँकेस निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत.