नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बांगलादेशच्या सीमेपर्यंत प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेसमधून बांगलादेशी महाराष्ट्रात आल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विधिमंडळात केली आहे.
खासगी बसेसमधून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घालण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणीदेखील आ. फरांदे यांनी केली आहे. राज्यात खासगी बसेसच्या अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचा मुद्दा आ. फरांदे यांनी विधानसभेत उपस्थित केला.
महामार्गावर बस व ट्रक वाहतूक नियमांचे पालन न करता एकाच लेनमध्ये न चालविल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, अपघातांची शक्यता वाढत आहे. याकडे आरटीओ विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
बस व ट्रक यांनी नियमानुसार निश्चित लेनमध्येच प्रवास करणे बंधनकारक करण्यात यावे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच काही खासगी बसेस एकाच चेसिस नंबर व ऑल इंडिया परमिटचा वापर करून इतर अनेक बसेस चालवत असल्याचे गंभीर प्रकार निदर्शनास आले आहेत.
एका चेसिस नंबरवर चार-पाच बसेस धावत असल्याची बाबही समोर आली आहे. या बसेस बांगलादेश सीमारेषेपर्यंत प्रवास करत असून, तेथून बांगलादेशी नागरिकांना नाशिक तसेच महाराष्ट्रात आणले जात असल्याचेही त्यांनी सभागृहात नमूद केले.
या सर्व प्रकारांची सखोल चौकशी करून संबंधित बसेसवर तत्काळ कारवाई करण्यात यावी तसेच अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर नियंत्रण आणावे, अशी ठाम भूमिका आ. फरांदे यांनी मांडली. यावर उत्तर देताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी अशा बसेसची तत्काळ चौकशी करून नियमभंग आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.