देवळा : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील विठेवाडी, लोहोणेर व परिसरात गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा दागिन्यांची पेटी पळवून नेल्याच्या घटनेनंतर तातडीने पोलिस चौकी उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
विठेवाडी येथील दलित वस्तीत राहणारे सहादू नारायण अहिरे हे बाजारासाठी बाहेरगावी गेले होते. तसेच कुटुंबीय वटपौर्णिमा पूजेसाठी घराबाहेर असल्याची संधी साधून चोरट्यांनी घरातील लोखंडी पेटी पळवून गिरणा नदीकाठावरील काटेरी झुडपात नेली. कुलूप तोडून त्यातील सुमारे एक लाख २७हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली.
याप्रकरणी अहिरे यांनी देवळा पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर तीन दिवसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनय देवरे पथकासह तपास करीत आहेत. सहा दिवस उलटल्यानंतरही चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही. काही संशयितांचे बँक व्यवहार आणि कॉल डिटेल्सची पडताळणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
यापूर्वीही विठेवाडी शिवारात दूरसंचार विभागाचे खांब चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. वसंतदादा सहकारी साखर कारखान्यातही मोठी चोरी झाल्याने परिसरातील कायदा - सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर विठेवाडी चौफुली किंवा साखर कारखान्याच्या राम मंदिर परिसरात कायमस्वरूपी पोलिस चौकी उभारावी, अशी मागणी ग्रामस्थ व कारखाना वसाहतीतील कामगारांनी केली आहे. त्यामुळे चोरीसह अवैध वाळू उपसा व बेकायदा धंद्यांनाही आळा बसेल. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. या घटनांचा छडा लावून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.