नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मालेगावमधील त्या शिक्षक मृत्यू प्रकरणाला कोणी राजकीय रंग देत असेल तर ते योग्य नाही. त्या संस्थेबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी माझ्याकडेही करण्यात आल्या असल्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. त्या शिक्षकाच्या मृत्यू प्रकरणाची 'एसआयटी'मार्फत चौकशी सुरू असून, कायदा आपले काम करीत आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल आणि त्यानुसार कारवाई केली जाईल, असेही मंत्री भुसे यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिक्षणमंत्री भुसे नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. मंत्री भुसे पुढे म्हणाले की, संबंधित शाळेची पटसंख्या सुमारे ७०० दाखवली जात असली, तरी प्रत्यक्षात केवळ १०० ते १२५ विद्यार्थी उपस्थित असतात. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा राष्ट्रीय उत्सव साजरा होत असताना घडलेल्या प्रकाराचीही चौकशी केली जात आहे.
या शाळेत सुमारे ३० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. हे प्रकरण मुख्याध्यापक आणि संबंधित संस्थेशी निगडित आहे. अधिकाऱ्यांच्या स्कॅन केलेल्या सह्या वापरून भरती केल्याचा, कर्मचारी भरती न करता शासनाचे अनुदान घेतल्याचा तसेच काही कर्मचाऱ्यांच्या नावावर कर्ज काढल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
नोकरी लावण्याच्या आमिषाने अनेकांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले. या सर्व बाबींची चौकशी केली जात असून, प्रकरणात कोणत्याही प्रकारचे राजकारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शालार्थ आयडी प्रकरणी अहवालानंतर कारवाई
शालार्थ आयडी प्रकरणाबाबत भुसे यांनी सांगितले की, या प्रकरणातील पहिली कारवाई नागपूरमध्ये झाली आहे. 'एसआयटी'ने प्राथमिक अहवाल सादर केला असून, ही चौकशी संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. उत्तर महाराष्ट्रातील चौकशीची प्रक्रिया अद्याप सुरू व्हायची आहे. 'एसआयटी'चा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही दादा भुसे यांनी स्पष्ट केले.
'मला जी जबाबदारी आणि खुर्ची दिली आहे, तिचा अवमान होणार नाही यासाठी मी प्रयत्न करीत आहे. नाशिक जिल्ह्यातही मी भेटी देऊ शकतो. यापूर्वी इतर राज्यांमध्ये ज्या पद्धतीने भेटी दिल्या, त्याच पद्धतीने येथेही वस्तुस्थिती जाणून घेतली जाईल, असे मंत्री भुसे यांनी सांगितले. मालेगावच्या जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकारणाचा विषय नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.