नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
बाजारात ग्राहकांची संख्या कमी झाल्याने बहुतांश पालेभाज्या व फळभाज्यांच्या दरात ५ ते १० टक्क्यांची घसरण झाली आहे. मात्र, कमी आवकेमुळे कोथिंबिरीला रविवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रमी ११,९०० रुपये प्रतिशेकडा असा कमाल दर मिळाला. जिल्ह्यात सुरू झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.
पावसामुळे ग्राहकांची बाजारपेठेकडे ये-जा कमी झाल्याने विक्रीवर परिणाम झाला आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून भाजीपाल्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. फळभाज्यांना प्रतिकिलो ६० ते ६५ रुपये दर मिळत होते. मात्र, सध्या कांदापात, मेथी, शेपू यांसारख्या पालेभाज्यांच्या दरात घसरण झाली आहे.
रविवारी झालेल्या लिलावात कोथिंबिरीला विक्रमी ११,९०० रुपये प्रतिशेकडा, तर मेथीला ७ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यामुळे किरकोळ बाजारात कोथिंबिरीची जुडी ६० ते ७० रुपये, तर मेथीची जुडी ५० ते ७० रुपयांना विकली जात आहे.
पावसामुळे भाजीपाला ओला होऊन खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकरी उपलब्ध माल तातडीने विक्रीसाठी आणत असले तरी बाजारातील एकूण आवक सुमारे ४० ते ५० टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिली आहे. दुसरीकडे मुंबई व उपनगरांमध्येही मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून, नाशिकमधून भाजीपाल्याची बाहेर पाठवणीही अडचणीत आली आहे.
पुरवठा मर्यादित असतानाही ग्राहकांची मागणी कमी असल्याने व्यापाऱ्यांना दर कमी करावे लागत आहेत. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत असून, उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पावसाची हीच परिस्थिती कायम राहिल्यास पुढील काही दिवसांत पालेभाज्यांच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केली