नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली संततधार कायम असून, हवामान विभागाने बुधवारी (दि. २९) जिल्ह्यासाठी पुन्हा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. त्यानुसार नाशिक शहरासह घाटमाथ्याच्या भागात विजांच्या कडकडाटांसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून, प्रतितास ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात संततधार सुरू असून, सोमवारी नाशिक परिसरात सुमारे ५४ मिमी पावसाची नोंद झाली. यात रात्रीच्या वेळी सुमारे ४७.४ व दिवसभर सुमारे ६.६ एवढ्या पावसाची नोंद झाली. दिवसभरात पावसाची नोंद कमी प्रमाणात असली तरी ढगाळ वातावरणासह पावसाची रिपरिप सुरू होती.
दुसरीकडे पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने प्रमुख धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गात प्रशासनाने टप्प्याटप्प्याने कपात केली आहे. त्यामुळे गोदावरीसह अन्य नदीपात्रांतील पाणीपातळीत काही प्रमाणात घट झाली असली तरी बुधवारी पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
आवश्यकतेनुसार धरणांमधील विसर्गात बदल करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी नदी-नाले व धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळावे, पूरग्रस्त किंवा सखल भागात अनावश्यक वावर करू नये तसेच वीज कडकडत असताना उघड्या जागेत थांबणे टाळावे,
असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी आणि नागरिकांनी हवामान विभाग व प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.