नाशिक : शहरातील रस्त्यांवरील खड्यांच्या प्रश्नाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. निर्धारित वेळेत कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करावी तसेच त्यांची पुढील कामे थांबवावीत, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
सिंहस्थ नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा जवळ येत असताना शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, खड्यांमुळे वाढलेले अपघात आणि नागरिकांमधील नाराजी या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागांची सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेतली. विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असताना नागरिकांमध्ये रोष निर्माण होत असेल, तर यंत्रणांनी आत्मपरीक्षण करण्याची असल्याचे त्यांनी नमूद केले. गरज बैठकीत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, खड्डे बुजवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांची पुढील कामे थांबवा.
नागरिकांना कारणे सांगू नका, त्यांना प्रत्यक्ष कामातून समाधान मिळाले पाहिजे. रिलॅक्स राहून चालणार नाही. सर्व विभागांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे. अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून काम करू नये. नागरिकांशी संवाद साधून प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घ्यावी, असेही फडणवीस यांनी बजावले.
बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, आ. देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, हिरामण खोसकर, महापौर हिमगौरी आडके-आहेर, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गॅसजोडणीची रखडलेली कामे पूर्ण करा
महानगर गॅस कंपनीच्या कामांमुळे रस्त्यांवर होणारा खोदकामाचा त्रास कमी करण्यासाठी महापालिका आणि कंपनीने समन्वयाने काम करावे. विविध विभागांमध्ये समन्वय नसल्यामुळे कामे रखडल्याची नाराजी व्यक्त करताना प्रलंबित गॅसजोडणीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.