नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर तपोवनानंतर आता वनराईने समृद्ध असलेल्या गंगापूर रोडवरील शेकडो वर्षांपूर्वीच्या झाडांवर मनपाच्या आदेशाने रस्ते रुंदीकरणाचे कारण देत कुन्हाड चालविण्यात आली. त्यावर वृक्षप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये वाद होऊन तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने स्थानिकांसह वृक्षप्रेमी आंदोलनकत्यांना सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले.
वृक्ष तोडताना आपल्या मुलांचा विचार करा, झाडे जगवू तरच पुढील पिढीला प्राणवायू, वटवृक्षांचा करा सन्मान न्यायालयाचा नको अवमान, शिवरायांना आठवा आता वृक्षसंपदा वाचवा, वृक्ष जगवण्याबाबतची अशी फलके हातात घेऊन गंगापूर रोड येथे सोमवारी (दि. ६) सकाळी ७ पासून वृक्षप्रेमींनी संतप्त आंदोलन छेडले. त्याचबरोबर झाडे काढा आणि मनुष्यजीव वाचवा असा स्थानिक रहिवाशांनी पवित्रा घेत रस्त्याच्या मधोमध येणारी, जीव घेणारी झाडे काढलीच पाहिजे म्हणून वृक्षतोडीस समर्थन करत होते.
त्यामुळे गंगापूर रोडवर तब्बल दोन ते चार तास वाहतूककोंडी निर्माण झाली. वृक्षतोड होत असल्याचे बघताक्षणीच वृक्षप्रेमी संतप्त होत त्यांनी एकजुटीने साखळी आंदोलनाचे कवच झाडांना दिले. मात्र, त्याचवेळी रस्त्यांच्या मधोमध येणाऱ्या झाडांमुळे मनुष्यजीवन वाचले पाहिजे, या कारणास्तव वृक्षतोड ही झालीच पाहिजे. वृक्षतोडीस समर्थन करणारे स्थानिक आणि वृक्षप्रेमी हमरीतुमरीवर आले आणि रस्त्यावरच तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पोलिस प्रशासनाच्या सहकार्यामुळे लगेचच ३० ते ३२ आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना सरकारवाडा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. यावेळी वृक्षप्रेमी अंकुश पवार यांनी पोलिस प्रशासनाला प्रशासकीय नोटीसबाबत विचारणा केली असता, त्यांनादेखील कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. पक्षी, प्राणी आणि जैवविविधतेचा विचार न करता वृक्षतोडीस मोठ्या प्रमाणावर यावेळी विरोध करण्यात आला होता, मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरत वटवृक्षांची केवळ आठवण घेऊन त्यांना माघारी फिरावे लागले.
सिहस्थाच्या पार्श्वभूमीवर वृक्ष प्राधिकरण समिती अंतर्गत मंजुरीनुसारच कायदेशीररीत्या झाडे तोडली जात आहेत. रस्त्याच्या मधोमध येणारा अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांमुळे अनेक वाहनधारकांचे जीव गेले आहेत. अनेकांच्या घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने स्थानिक रहिवाशांच्या मागणीमुळे ही वृक्षतोड केली जात आहे.विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक, महानगरपालिका
गंगापूर रोडवरील रस्त्यांच्या मधोमध येणाऱ्या झाडांमुळे अनेकांना नाहक जीवाला मुकावे लागले आहेत. विशषेतः बाहेरगावावरून आलेल्या प्रवाशांच्या बाबतीत रात्रीच्या वेळी अपघातांच्या मालिकेत वाढ झाल्याचे समोर आले आहेत. याबाबत आदेश आल्यानंतर वृक्ष काढले जात असल्याने आज आम्हाला न्याय मिळतो आहे, रस्ता मोकळा होत आहे.- राजेंद्र सावरकर, स्थानिक नागरिक