नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्याला लवकरच आणखी एक खासदार मिळण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे नाव निश्चित मानले जात आहे. या संदर्भात रविवारी (दि. ७) राष्ट्रवादीच्या कोअर कमिटी बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
भुजबळांच्या या संभाव्य दिल्ली वारीमुळे जिल्ह्याच्या राजकारणातील सारिपाट बदलणार असून, भुजबळ फार्मच्या या मास्टरस्ट्रोकची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भुजबळ यांनी राष्ट्रीय राजकारणात जाण्याची इच्छा व्यक्त केली असून, त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. यात भुजबळ यांनी पुतणे समीर भुजबळ यांना राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून समावेश करून घेण्याची अट ठेवली आहे. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत दिल्लीत वरिष्ठांशी चर्चा करावी लागेल, असे सांगितले.
त्यावर रविवारी निर्णय होण्याची शक्यता होती. परंतु, रात्री उशिरापर्यंत यावर निर्णय झाला नव्हता. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या 'देवगिरी' या निवासस्थानी रात्री उशिरा झाली. या बैठकीत प्रामुख्याने राज्यसभेच्या उमेदवारीवर चर्चा झाली. भुजबळ यांच्या नावावर कमिटीत एकमत झाल्याचे सांगितले जात आहे. एकमत झालेले असले तरी, भुजबळ यांच्या अटीबाबत मुख्यमंत्र्यांकडून कोणताही सिग्नल मिळालेला नव्हता. त्यामुळे भुजबळ सोमवारी (दि. ८) उमेदवारी अर्ज दाखल करतात का याकडे लक्ष लागले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात भुजबळांची एन्ट्री ?
भुजबळांची राज्यसभेची उमेदवारी निश्चित झाल्यास नाशिक जिल्ह्याला एक खासदार मिळणार आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातून राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे तसेच डॉ. शोभा बच्छाव असे लोकसभेचे खासदार लोकसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत. भुजबळ यांच्या रूपाने जिल्ह्याला राज्यसभेच्या माध्यमातून आणखी एक वजनदार खासदार मिळणार आहे. भुजबळ हे राज्यसभेवर गेल्यास त्यांची केंद्रात मोदी मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भुजबळ हे केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे लाडके मानले जात आहेत. राज्यसभेवर भुजबळ आल्यास देशात ओबीसी चेहरा म्हणून त्यांना मोठी संधी आहे. याचा मोठा फायदा भाजपला मिळू शकतो. जिल्ह्याचा विकास आणि केंद्रातील वजन कमालीचे वाढणार आहे. मात्र, भुजबळ दिल्लीत गेल्यामुळे रिक्त होणाऱ्या येवला विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागणार असून, मंत्रिमंडळातील त्यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार? हा मोठा प्रश्न आहे. एकूणच निवडणुकांमध्ये राजकीय सारिपाट पूर्णपणे बदलू शकतो