Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal file photo
नाशिक

Chhagan Bhujbal | येवल्यातूनच लढणार अन् मताधिक्याने जिंकणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ हे येवला मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसून, इतर सेफ मतदारसंघ शोधण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा राज्यभरात होत होत्या. या सर्व तर्क-वितर्कांना मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पूर्णविराम दिला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी, मी येवला- लासलगाव मतदारसंघातूनच निवडणूक लढणार आणि मोठे मताधिक्य घेऊन निवडून येणार असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता या मतदारसंघातून महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देते, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राज्यात मराठा-ओबीसीमध्ये आरक्षणावरून मोठा वाद सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मराठा नेते मनोज जरांगे - पाटील आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात कलगीतुरा रंगत आहे. गेल्याच आठवड्यात मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप नाशिकमध्ये करण्यात आला होता. त्यामध्ये भुजबळांना येवल्यात पाडण्याचे थेट आवाहन जरांगे यांनी केले होते. त्यानंतर भुजबळ दुसऱ्या मतदारसंघाचा शोध घेत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

यावेळी मंत्री भुजबळ यांनी नार-पार योजनेबाबत बोलताना, ज्या राज्यात पाऊस पडतो, ते पाणी त्या राज्याचे आहे. या तत्त्वानुसार महाराष्ट्रात पडणारे पावसाचे पाणी वापरण्याचा पूर्ण अधिकार महाराष्ट्राचा असल्याने नार-पार प्रकल्प विरोधी पक्ष नेता असताना मांडला होता. मराठवाड्याला पाणी द्यायचे असल्यास हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. केंद्र सरकारने मदत केली नाही, तर राज्य सरकार पैसे खर्चून हा प्रकल्प पूर्णत्वास नेईल, असे त्यांनी सांगितले.

जिवंतपणी चौकाला नाव दिले चांगले केले

भुजबळांच्या मतदारसंघात मनोज जरांगे यांच्या कार्यकर्त्यांनी चौकाला मनोज जरांगे-पाटील चौक असे नाव दिले आहे. या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री भुजबळ यांनी, चार-पाच लोक एकत्र येतात आणि बॅनर तयार करून चौकाला नाव देतात. पण जिवंतपणी चौकाला नाव दिले हे चांगले असल्याचा टोला लगावला.

SCROLL FOR NEXT