नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विधानसभेच्या सदस्य झाल्याने त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर रिक्त जागेसाठी मंत्री छगन भुजबळ, जय पवार यांच्या नावांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, जय पवार यांनी बारामतीतच काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यसभेसाठी भुजबळांचा मार्ग सुकर झाल्याचे बोलले जात आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभेसाठी मंत्री भुजबळ इच्छुक होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच नाशिक लोकसभेसाठी त्यांचे नाव पुढे केले होते. मात्र, महायुतीच्या वाटाघाटीचा घोळ सुरू राहिल्यामुळे भुजबळ यांनीच उमेदवारी करणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर, झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भुजबळांचे नाव आघाडीवर होते. परंतु, बारामती लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यामुळे सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी संधी देण्यात आली त्यावेळी भुजबळ यांनी नाराजीदेखील व्यक्त केली होती.
मार्च महिन्यात राज्यसभेच्या झालेल्या निवडणुकीतही भुजबळांच्या नावाची चर्चा जोरात होती. परंतु, अजित पवार यांचे नुकतेच निधन झालेले असल्यामुळे या जागेसाठी त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना पक्षाने संधी दिली. आता सुनेत्रा पवार बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या.
असल्यामुळे त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या रिक्त जागेसाठी छगन भुजबळांचे नाव पुन्हा आघाडीवर आहे. भुजबळ यांच्या समवेत जय पवार यांच्या नावासाठी पक्षातील दुसऱ्या फळीतील नेते आग्रही झाले होते. परंतु, जय पवार यांनी बारामतीतच काम करण्याची तयारी दर्शविली. असल्यामुळे आता या रिक्त जागेसाठी छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर आहे.
भाजपची पसंती भुजबळ यांनाच
भुजबळ ओबीसींचे नेते आहे. मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण भूमिकेवर भुजबळ यांनी उघडउघड विरोध केला होता. याचा फायदा महायुतीला विशेषः भाजपला विधानसभा निवडणुकीत झाला. याच ओबीसी चेहऱ्याचा केंद्रात फायदा करून घेण्यासाठीच लोकसभेसाठी भुजबळांच्या उमेदवारीचा आग्रह खुद्द अमित शाह यांनी धरला होता. भाजपची पसंती ही भुजबळ यांच्या नावाला आहेच. देशभरात भुजबळांनी ओबीसींचे मोठे जाळे विणले आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांच्या नावाला भाजप पसंती देऊ शकतो.
पक्षाचा निर्णय अंतिम : भुजबळ
राज्यसभेवर मला पाठवा असा माझा आग्रह नाही, परंतु पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल, असे मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. भुजबळ म्हणाले की, सुनेत्राताई या आता उपमुख्यमंत्री आहेत आणि त्या विधानसभेतदेखील निवडून आल्या आहेत, त्यामुळे राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे.
आता मूळ मुद्दा हा आहे की, त्यांच्या जागी कोण जाणार? हे आम्ही मीडियामध्ये पाहात असतो, वर्तमानपत्रांमध्ये वाचत असतो. अजून त्याच्यावर चर्चा वगैरे काही झालेली नाही. मला तरी तशी कोणतीही माहिती नाही. त्यामुळे पक्ष काय निर्णय घेईल तो घेईल. आता माझ्याबद्दल बोलाल, तर माझ्याकडे मंत्रिपद आहे. मी ज्येष्ठ मंत्री आहे. त्यामुळे मला राज्यसभेवरच पाठवा असा आग्रह धरणे चुकीचे आहे, असे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.