सप्तशृंगगड : पुढारी वृत्तसेवा
सकाळचे आल्हादायक वातावरण.. बोल अंबे की जय, सप्तशृंगी माता की जय...चा जयघोष अन् भाविकांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद..अशा भक्तिमय वातावरणात साडेतीन शक्तिपीठापैकी अर्धपीठ असलेल्या सप्तश्रृंगगडावर नवरात्रोत्सवास गुरुवारी (दि. 3) उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी देवी दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने गड परिसर फुलून गेला होता. सकाळी आठ वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयात मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. व्ही. वाघ यांच्या हस्ते श्री भगवतीच्या आभूषणांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भगवतीच्या आभूषणांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मिरवणुकीनंतर पंचामृताने देवीच्या उत्सवमूर्तीवर अभिषेक करण्यात आला.
भरजरीचे महावस्त्र नेसवून साजशृंगार करून भगवतीस आभूषणे परिधान करण्यात आले. त्यात सोन्याचे मंगळसूत्र, पुतळी गाठले, कोयरीहार, वज्रटिक, बोरमाळ, कर्णफुले, नथ, पाऊल, गुलाबहार आदी आभूषणांचा समावेश आहे. त्यानंतर प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या हस्ते पंचामृत महापूजा करण्यात आली. यावेळी विश्वस्त बी. व्ही. वाघ, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड यांच्या उपस्थितीत घटस्थापना झाली. यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यातील उजव्या बाजू विविध धर्मीय 1111 घटांची स्थापना दुपारी 12 वाजता स्थापना झाली. दरम्यान, यात्रोत्सवासाठी पहिल्या दिवसापासूनच भाविकांची गर्दी गडावर वाढली असून, पुढील नऊ दिवस गडावर चैतन्यमय वातावरण राहणार आहे. दरम्यान, दिवसेंदिवस गडावर भाविकांच्या संख्येत वाढ होत असताना या ठिकाणी आवश्यक विकासकामे तसेच सुविधा देणे आवश्यक असताना संस्थान व ग्रामपंचायतीकडून याबाबत फारसे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
यंदा विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर राज्यभरातून इच्छुक उमेदवार देवीला साकडे घालण्यासाठी गडावर पाेहोचत आहेत. त्यामुळे यंदाच्या नवरात्रोत्सवात भाविकांबरोबरच राजकीय भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे. पहिल्याच दिवशी राजकारण्यांची दर्शनासाठी चांगलीच गर्दी दिसून आली.
नवरात्रोत्सव काळात गडावर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता खासगी वाहनांना थेट गडावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना पायथ्याशी असलेल्या वाहनतळावर वाहन पार्क करून महामंडळाच्या बसने प्रवास करावा लागणार आहे.
मेळा बसस्थानक हे गावापासून दीड किमी अंतरावर असलेल्या याठिकाणी अक्षरशः चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. एकीकडे यात्राकाळात कोटी रुपये एसटीच्या माध्यमातून कमावले जाते, पण दरवेळी बसस्थानकमध्ये सुविधांचा अभाव असतो.