लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
बफर स्टॉक योजनेंतर्गत कांदा खरेदीचा दर केंद्र सरकारने प्रतिक्विंटल १,६५० रुपयांवरून १,७३० रुपये (प्रतिकिलो १७.३० रुपये) केला असून, हा सुधारित दर २० जून २०२६ पासून लागू झाला आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे ही माहिती दिली.
प्रतिकिलो केवळ ८० पैशांनी वाढ केल्यामुळे शेतकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना अधिक मोबदला मिळण्यास मदत होणार असून, बाजारभाव स्थिर ठेवण्याच्या प्रयत्नांनाही बळ मिळणार आहे.
सुधारित खरेदी दर निश्चित करताना बाजारातील प्रचलित दर आणि साठवणुकीसाठी योग्य दर्जाच्या कांद्याचा विचार करण्यात आल्याचेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. २०२६ २७ या आर्थिक वर्षात दोन लाख टन कांदा खरेदीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. तसेच किंमत स्थिरीकरण फंड अंतर्गत बफर स्टॉक कायम ठेवून आवश्यकतेनुसार बाजारात हस्तक्षेप करून ग्राहकांनाही दिलासा देण्याचे सरकारचे धोरण आहे.
कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने खरेदी दरात केलेली वाढ ही शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात दिलासादायक ठरणार असली, तरी उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा दर अद्यापही अपुरा असल्याची भावना अनेक शेतकरी संघटनांकडून व्यक्त होत आहे. सरकारने प्रतिकिलो अवघ्या ८० पैशांनी दर वाढविल्यामुळे शेतकऱ्यांना काहीही फायदा होणार नसल्याचा दावा संघटनांनी केला आहे.