Catch the leopard or we will catch it, angry protesters issue a strong warning to the forest department
नाशिक : पुढारी वृत्तसेवा वडनेर दमाला येथे १० दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय आयुष किरण भगत याचा मृत्यू झाला. मात्र, अद्यापही बिबट्याला पकडण्यात वनविभाग अपयशी ठरल्याने संतप्त ग्रामस्थांनी उंटवाडी येथील वनविभाग कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदविला. सात दिवसांत बिबट्याला जेरबंद न केल्यास आम्ही स्वतःच्या पद्धतीने कारवाई करू, त्यासाठी पकडण्याची परवानगी द्या. अशी मागणी ग्रामस्थांनी मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांच्याकडे केली आहे.
वडनेर दुमाला येथे ८ ऑगस्टच्या रात्री घडलेल्या घटनेनंतर वनविभागाने पंचक्रोशीत २१ पिंजरे लावले. मात्र, १४ ऑगस्टला बिबट्याने पिंजऱ्यातील शेळी फस्त करून नंतर त्याच पिंजऱ्यावर चढून बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप पसरला आहे. पिंजऱ्यात येऊनही बिबट्या जेरबंद झाला नाही, हे वनविभागाचे अपयश असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वडनेर दुमाला ते उंटवाडी येथील वनविभाग पश्चिमच्या कार्यालयावर बुधवारी (दि. २०) मोर्चा नेला. मोर्चात जवळपास १५०० ग्रामस्थ सहभागी झाले. यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. दुपारी १ वाजता मोर्चेकरी वन कार्यालयात धडकले. याठिकाणी मोर्चेकऱ्यांसोबत मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, शिवसेना उबाठा गटाचे वसंत गिते, दत्ता गायकवाड आदींसह माजी नगरसेवक केशव पोरजे यांनी ठाण मांडले.
मोर्चेकऱ्यांनी मुलाच्या बळीस वनविभागाचा निष्काळजीपणा जबाबदार, बिबट्याला पकडा, जनतेला वाचवा, एक आयुष आम्ही गमावलाय, दूसरा आयुष आम्हाला गमवायचा नाही आदी फलक झळकवत वनविभागाविरोधात घोषणा दिल्या. शिष्टमंडळाशी मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन आणि उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर यांनी चर्चा केली. पाटील आणि गिते यांनी बिबट्याचा बंदोबस्त करा अन्यथा त्याला मारण्याची परवानगी मागितली. मृत आयुषची ५ वर्षीय बहीण श्रेया हिने 'आता मी कुणाला राखी बांधू' असा प्रश्न विचारताच उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले. मोर्चादरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
मुख्य वनसंरक्षकांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी नांदेड आणि अहिल्यानगर येथून दोन पथकांना पाचारण करण्यात आल्याचे सांगितले. मात्र मोर्चेकरी ऐकण्यास तयार नव्हते. किती दिवसांत बिबट्याला पकडणार हे सांगा, यावर ते अडून बसले. तेव्हा पुढील ७ दिवसांत बिबट्याला पकडणार, अशी ग्वाही उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर यांनी दिल्याने मोर्चेकऱ्यांचे समाधान झाले.
दि. १४ ऑगस्टला बिबट्याने पिंजऱ्यातील शेळी ठार केली, मात्र तो पिंजऱ्यात अडकला नाही. त्यामुळे ग्रामस्थांचा संयम सुटत आहे. नरभक्षक बिबट्या सात दिवसांत पकडावा, अन्यथा आठव्या दिवशी ग्रामपंचायतीत ठराव करून पुढील निर्णय घेण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे.
अधिकाऱ्यांनी शब्द पाळावा अन्यथा वनमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा काढू, मंत्र्यांनाच पिंजऱ्यात कोंडू, असा इशारा यावेळी आयुषची आई रेखा भगत यांनी दिला. तर, मुख्य वनसंरक्षकांनी ग्रामस्थांना आश्वस्त करत बिबट्याला ट्रेंग्युलाइज करण्यात येईल अर्थात बेशुद्ध करून पकडण्यात येईल, असे सांगितले.