नाशिक : भटक्या आणि मोकाट मांजरांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी महापालिकेने नाशिक सुरू केलेल्या निर्बीजीकरण मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. मोकाट कुत्र्यांच्या धर्तीवर मांजरांचेही निर्बीजीकरण करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून मक्तेदाराची नियुक्ती करण्यात आली. मात्र, मांजरी सहजपणे हाती लागत नसल्यामुळे गेल्या सहा महिन्यांमध्ये केवळ २२ मांजरींवर निर्बीजीकरणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सुरू करण्यात आलेली ही योजना सध्या कागदावरच प्रभावी ठरत असल्याचे चित्र आहे.
शहरातील भटक्या व मोकाट मांजरांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करून त्यांना रेबिज प्रतिबंधक लस देण्याची कार्यवाही अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया (एडब्ल्यूबीआय) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत केली जात आहे. यासाठी निविदा प्रक्रियेतून पुणेस्थित युनिव्हर्सल अॅनिमल वेल्फेअर या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. एका मांजरीच्या निर्बीजीकरणासाठी मक्तेदाराला दोन हजार रुपये अदा केले जातात. मात्र, भटक्या कुत्र्यांच्या तुलनेत मांजरी पकडणे अधिक जिकिरीचे ठरत आहे.
मांजरांना पकडण्यासाठी संबंधित भागात पिंजरे लावावे लागतात. त्यातही मांजरांबाबत नागरिकांच्या तक्रारींचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे अशा तक्रारींच्या आधारे कारवाई करण्याच्या संधीही कमी आहेत. परिणामी, निर्बीजीकरणासाठी आवश्यक संख्येने मांजरी उपलब्ध होत नसल्याने मोहिमेला अपेक्षित गती मिळालेली नाही
वर्षाला १८ पिले; संख्या नियंत्रणाचे आव्हान
एका मांजरीपासून वर्षभरात मोठ्या प्रमाणात पिलांची संख्या वाढू शकते. त्यामुळे भविष्यात भटक्या मांजरांची संख्या नियंत्रणाबाहेर जाऊ नये, यासाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निर्बीजीकरणावर भर देण्यात आला आहे. मांजरांची संख्या वाढत गेल्यास नागरिकांना होणारा उपद्रव, संसर्गजन्य आजारांचा संभाव्य धोका तसेच प्राणी कल्याणाशी संबंधित प्रश्नही निर्माण होऊ शकतात.
तक्रार आली, तरच पिंजरा
भटक्या किंवा मोकाट मांजरांविषयी नागरिकांकडून तक्रार आल्यानंतर संबंधित ठिकाणी पिंजरा लावून मांजर पकडण्यात येते. त्यानंतर तिच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया व आवश्यक लसीकरण केले जाते. उपचारानंतर काही दिवसांनी त्याच ठिकाणी मांजरीला पुन्हा सोडण्यात येते. मात्र, तक्रारींचे प्रमाणच कमी असल्यामुळे मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे महानगरपालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
नागरिकांकडून भटक्या व मोकाट मांजरांविषयी तक्रारी आल्यानंतर संबंधित ठिकाणी पिंजरे लावून मांजरी पकडल्या जातात. त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करून काही दिवसांनी त्याच ठिकाणी सोडण्यात येते. भटक्या मांजरांविषयी तक्रारींचे प्रमाण अल्प असल्याने निर्बीजीकरण प्रक्रियेला अपेक्षित गती मिळालेली नाही.- डॉ. प्रमोद सोनवणे, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका