नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
जातवैधता प्रमाणपत्राच्या प्रक्रियेला वेग देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. १ जानेवारी ते ३१ जुलै या कालावधीत प्राप्त झालेल्या २१ हजार ३३ अर्जांपैकी १९ हजार ३७६ अर्ज वैध ठरले आहेत. वैध प्रमाणपत्रे अर्जदारांच्या नोंदणीकृत ई-मेलवर पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे उच्च शिक्षण, शिष्यवृत्ती, व्यावसायिक अभ्यासक्रमांतील प्रवेश तसेच विविध शासकीय सवलतींसाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र वेळेत मिळण्यास विद्यार्थ्यांना मदत होत आहे.
जातवैधता प्रमाणपत्रासाठी मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त होत असल्याने समाजकल्याण विभागासमोर कागदपत्रांची छाननी, जुन्या नोंदी तपासणे, अर्जातील त्रुटी दूर करणे आणि प्रकरणांची पडताळणी करण्याचे आव्हान असते.
अनेकदा अपूर्ण कागदपत्रे, माहितीतील तफावत किंवा आवश्यक पुरावे उपलब्ध नसल्यामुळे अर्जदारांच्या स्तरावर प्रकरणे प्रलंबित राहतात. सध्या ९८४ अर्ज आवश्यक त्रुटींची पूर्तता न झाल्याने अर्जदारांच्या स्तरावर प्रलंबित आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी व अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्जातील त्रुटी दूर केल्यास प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, मागील १५ दिवसांत प्राप्त झालेल्या ६७३ प्रकरणांवर कारवाई सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर अर्ज निकाली काढून प्रमाणपत्रांचे वितरण झाल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत अडथळे कमी होण्याबरोबरच शिष्यवृत्ती व इतर शासकीय योजनांचा लाभ घेणेही सुलभ होणार आहे.
वैध ठरलेले प्रमाणपत्र थेट नोंदणीकृत ई-मेलवर पाठवले जात असल्याने विद्यार्थ्यांना कार्यालयात वारंवार येण्याची गरज कमी झाली आहे. ऑनलाइन प्रक्रियेमुळे वेळ व खर्चाची बचत होत असून, प्रमाणपत्र वितरणात पारदर्शकता आणि गतिमानता वाढण्यास मदत होत आहे.