मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
मोसम नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या सातवर्षीय मोहम्मद ऐतेशाम मोहम्मद अब्दुल्ला (रा. हयात मशिदीजवळ, किल्ला परिसर) याचा मृतदेह चार दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मधूरपाडेजवळील गिरणा धरणाच्या पाठीमागील पाण्यात बुधवारी सायंकाळी आढळून आला. किल्ला तैराक ग्रुपचे शकील तैराक यांनी मृतदेह बाहेर काढला.
रविवारी दुपारी फरशी पुलावरून जात असताना ऐतेशाम हा मोसम नदीच्या पुराच्या प्रवाहात वाहून गेला होता. त्यानंतर अग्निशमन विभाग व किल्ला तैराक ग्रुपकडून सलग चार दिवस शोधमोहीम राबवण्यात आली.
मधूरपाडेजवळ मासेमारी करत असलेल्या रोहिदास अशोक माळी यांना पाण्यात मृतदेह तरंगताना दिसल्यानंतर त्यांनी शकील तैराक यांना माहिती दिली. त्यानंतर शकील तैराक यांनी सुमारे दोन ते तीन किलोमीटर पाण्यात जाऊन मृतदेह बाहेर काढला. मुख्य अग्निशमन अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला.
दरम्यान, घटनेनंतर बाग-ए-महेमूद व किल्ला परिसरातील शेकडो महिला व नागरिकांनी फरशी पुलावर तीव्र निदर्शने केली. नोमानी पुलाचे काम वेळेत पूर्ण झाले नसल्याने निष्पाप बालकाचा बळी गेल्याचा आरोप करत लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मृत बालकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची तसेच पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण शांत झाले.
मोसम नदीच्या पुरात वाहून जाण्याची आठ दिवसांतील ही दुसरी घटना आहे. प्रशासनाकडून पूरस्थितीत नदीपात्रातील मार्ग व पुलांचा वापर टाळण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत असले, तरी नागरिकांकडून दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा समोर आले.