लासलगाव : नाफेड, एनसीसीएफच्या कांदा खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून योग्य कारवाई करावी, अन्यथा गाडीवर कांदा फेक करत थोबाड रंगविण्याचा इशारा माजी मंत्री बच्चू कडू वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना दिला.
निफाड येथील शेतकरी मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे कांदा खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली. लासलगाव येथे दिव्यांगांना रेशन कार्ड व प्रमाणपत्र वाटपानंतर कडू यांनी नाफेडच्या गुदामावर वर जात पाहणी करत संताप व्यक्त केला.
कांद्याचे बाजारभाव वाढल्यानंतर भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाच्या ग्राहक संरक्षण विभागामार्फत दर वर्षीप्रमाणे यंदाही पाच लाख मॅट्रिक टन उन्हाळ कांदा नाफेड एनसीसीएफमार्फत खरेदी करण्यात आला. हा कांदा प्रोड्यूसर कंपन्यांमार्फत खरेदी करत त्यांच्याच गुदामात ठेवण्यात आला. एका दिवसातच इतक्या मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी झाली. ज्या शेतकऱ्यांजवळ कांदा आणि त्यांच्या नावावर ही बोगस खरेदी दाखवण्यात आली, याची खुद्द कबुली नाफेडचे अध्यक्ष जेठाबाई अहिर यांनी दिली. त्यानंतर थेट पंतप्रधानांकडे याबाबत तक्रार दिल्यानंतर आत्तापर्यंत चार समित्या चौकशीसाठी येऊनही काहीही साध्य झाले नसल्याचे निवृत्ती न्याहारकर, प्रहार संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, सागर निकाळे यांनी कडू यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे कडू यांनी गुदामांची पाहणी केली. या ठिकाणी एकही कांदा नसल्याने व गुदाम ओसाड पडल्याचे पाहून त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. याबाबत पणन मंत्री अब्दुल सत्तार यांना फोनवर संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यावर सत्तार यांनी बुधवारी (दि. 25) याप्रकरणी पणन विभागाच्या दालनात बैठकीचे आयोजन केल्याची माहिती कडू यांनी दिली.
वारंवार तक्रारी करूनही आमच्या तक्रारींची दखल शासन स्तरावर घेतली गेली नाही. त्यामुळे आमदार बच्चू कडू यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी तातडीने तक्रारीची दखल घेत लासलगाव येथील नाफेड गुदामावर पाहणी केली. त्यानंतर मंत्री पीयुष गोयल यांच्यावर संताप व्यक्त केला.- निवृत्ती न्याहारकर, अध्यक्ष शेतकरी बचत गट
नाफेड एनसीसीएफकडून खरेदी केलेल्या कांद्यासंदर्भात पिंपळगाव येथील नाफेडच्या गुदामावर जात भ्रष्टाचाराबाबत आंदोलने केली. मात्र, कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याने बच्चू कडू यांनी मंत्री पीयुष गोयल यांच्या गाडीवर कांदा फेकून थोबाड लाल करण्याचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.गणेश निंबाळकर, ग्रामीण जिल्हाप्रमुख, प्रहार जनशक्ती पक्ष