नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उर्दू शाळांमध्ये बोगस विद्यार्थी दाखविणे, शैक्षणिक सुविधांकडे दुर्लक्ष व गैरकारभार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी तसेच अशा गैरप्रकारच्या दोनपेक्षा अधिक गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती अथवा संस्थांविरोधात मोकोक्का अंतर्गत कारवाईची शक्यता तपासावी व तशी कारवाई करावी, अशा सूचना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी पोलिसांना दिल्या आहेत.
येथे अल्पसंख्याक समाजाशी संबंधित विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत प्यारे खान यांनी उर्दू शाळांच्या स्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कागदोपत्री दाखविली जाते, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष संख्या तपासून बोगस विद्यार्थी आढळल्यास संबंधितांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
शिष्यवृत्तीचे प्रस्ताव, शैक्षणिक सुविधा आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप यावेळी उपस्थितांकडून करण्यात आला, तर शासनाच्या योजना उपलब्ध असूनही त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसतील, तर त्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी भूमिका खान यांनी यावेळी मांडली.
दरम्यान, शाळांमध्ये शिक्षकांची आवश्यकता असताना अनेक वर्षे शिक्षक उपलब्ध नव्हते, त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झालेला परिणाम कोण भरून काढणार असा प्रश्न करतानाच, उर्दू शांशी संबंधित प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवूनही त्यावर वेळेत निर्णय होत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.
चार पत्रे पाठवूनही त्यांची दखल घेतली जात नसल्याने ती 'कचऱ्याच्या डब्यात गेल्यासारखी' परिस्थिती असल्याचा संताप यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. त्यावर शिक्षण विभागाकडून काही शाळांमध्ये शिक्षकांची भरती 'पवित्र' प्रक्रियेतून करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांसाठी जिल्ह्यात स्वतंत्र अल्पसंख्याक कक्ष तसेच सक्षम नोडल अधिकारी नसल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले. शासनाच्या योजना आणि निर्णयांची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करून नोडल अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी यावेळी उपस्थितांकडून करण्यात आली.
भारतनगर परिसरातील शाळेजवळ दारूचे दुकान असल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. स्थानिक पातळीवर राजकीय वरदहस्तामुळे अशा दुकानांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला. शाळेच्या परिसरातील अशा दुकानांची तपासणी करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी काही नागरिकांनी केली.
नाशिक शहरातील कब्रस्तानाचा प्रश्न, ख्रिस्ती समाजासाठी कब्रस्तान, दफनभूमीची जागा, मुलींसाठी वसतिगृहासाठी जागा, विवाह नोंदणीचे प्रलंबित प्रस्ताव, मदरसा बोर्डाशी संबंधित प्रश्न आदी विषयांवरही बैठकीत चर्चा झाली. यात प्रामुख्याने मुस्लिम समाजाच्या व ख्रिस्ती समाजाच्या जागांविषयी उपस्थितांनी प्रश्न उपस्थित केले. त्याचप्रमाणे मुलींसाठी वसतिगृह उभारण्याची व नाशिक विभागात 'हज हाऊस' सुरू करण्याची मागणीही यावेळी पुढे आली.