नाशिक: आदिवासी 17 संवर्ग पेसाभरतीच्या मागणीबाबत अनुसूचित जनजमाती आयोग सकारात्मक असून आदिवासींच्या मागणीचा प्रस्ताव आयोग राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसमोर सादर करेल, अशी ग्वाही आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या यांनी दिली.
पेसाभरतीच्या मागणीसाठी माजी आमदार तथा आदिवासी नेते जे.पी. गावित हे गेल्या 5 दिवसांपासून आदिवासी विकास भवनमध्ये आंदोलन करीत आहे. बुधवारी (दि.28) आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या यांनी त्यांची भेट घेतली. भेटीनंतर आर्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्ष आर्या पुढे म्हणाले की, आदिवासी बांधवांसाठीच आयोगाची निर्मिती झाली असून आदिवासींच्या समस्या सोडविण्यासाठी आयोग दिल्लीहून नाशिक येथे आला आहे.
पेसा भरतीच्या मागणीबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून त्वरीत कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. आयोग आदिवासी मुलांच्या भविष्यासाठी योग्य ती कार्यवाही करीत असून दिल्लीला पोहोचल्यानंतर त्वरीत राष्ट्रपती तसेच पंतप्रधान मोदींसमोर आदिवासींच्या मागण्या मांडण्यात येतील. तोपर्यंत आदिवासींनी धीर धरावा. मोर्चा आणि ठिय्या आंदोलनाबाबत आदिवासींचे नेतेच योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.