नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भोंदूगिरी, फसवणूक आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमध्ये गंभीर अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडवली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठे गौप्यस्फोट केले आहेत. दमानिया यांनी अशोक खरातशी संबंधित असल्याचा दावा करत अनेक राजकीय नेते, शासकीय अधिकारी आणि विविध पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली.
विशेष म्हणजे या यादीत नाशिक जिल्ह्यातील अनेक व्यक्तींचा समावेश असल्याने 'नाशिक कनेक्शन' पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दमानिया यांनी सांगितलेल्या नावांमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून ते मंत्री दीपक केसरकर, सुनील तटकरे, जयंत पाटील, चंद्रकांत पाटील, पद्मश्री पोपटराव पवार यांचा समावेश आहे.
तसेच कळवणचे आमदार नितीन पवार, सिन्नरचे उदय सांगळे, विधान परिषदेचे उमेदवार शिवाजी सहाणे, दादा भुसे यांचे पीए रामदास खेडकर, चंद्रकांत पाटील यांचे पीए मंगेश देशपांडे तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांचे ओएसडी राहुल कोतडे यांची नावेही त्यांनी जाहीर केली. याशिवाय प्रभाकर काळे, बाळासाहेब बोराडे, नंदकिशोर काटोरे, सचिन चुंभळे, मंगेश नवाळे, राहुल देशमुख, अविनाश पोटे, कमलाकर पोटे, महेंद्र शेळके-पाटील यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
दमानिया यांनी सांगितले की, त्यांच्या हाती आलेल्या कॉल रेकॉर्ड आणि भेटींच्या यादीत रूपाली चाकणकर, त्यांचा मुलगा सोहम चाकणकर, प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर, प्रफुल्ल चाकणकर आणि संकेत सायकर यांची नावेही समोर आली आहेत. या सर्व व्यक्तींचे खरातशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याचा दावा त्यांनी केला.
अशोक खरात याला १८ मार्च रोजी अटक करण्यात आली असून, तो गेल्या महिनाभरापासून पोलिस कोठडीत आहे. त्याच्यावर महिला अत्याचाराचे आठ, फसवणुकीचे सहा आणि धमकीचा एक असे एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. तपासादरम्यान पुत्रप्राप्तीचे आमिष दाखवून एका महिलेशी लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
या प्रकरणात विशेष तपास पथकाने न्यायालयात सविस्तर माहिती मांडल्यानंतर न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
कल्पना खरात अद्यापही फरारच
अशोख खरात याची पत्नी कल्पना खरात शिर्डी येथील जमीन बळकावल्याच्या प्रकरणात फरार असून, तिचा शोध घेण्यासाठी अहिल्यानगर पोलिस आणि एसआयटीचे पथक प्रयत्न करत आहेत. तपासादरम्यान राजकीय आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमवल्याचेही उघड होत आहे. या सर्व घडामोडींमुळे संबंधित व्यक्तींना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.