पिंपळगाव बसवंत : विधानसभेच्या विद्यमान (सीटिंग) जागा ज्यांना त्यांना राहाव्यात याबाबत महायुतीत प्राथमिक चर्चा झाली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. २) येथे दिली. कळवण दौऱ्यावर जाताना आमदार दिलीप बनकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पवार म्हणाले, महायुती जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली असून, विद्यमान जागांना प्रामुख्याने प्राधान्य देण्यात येणार आहे. परंतु, एखाद्या जागेवर विद्यमान उमेदवारापेक्षा इतर उमेदवार इलेक्टिव मेरिटमध्ये पुढे असेल तर त्याचाही विचार करून जागांची अदलाबदल होऊ शकते. यामुळे 'एबीसी'नुसार फॉर्म्युला लक्षात घेऊन काही ठिकाणी जागांबाबत बदल होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. दिंडोरीच्या जागेबाबत उलटसुलट चर्चा होत आहेत. एखाद्या पक्षाकडे आता जो उमेदवार आहे, त्यापेक्षा एखादा उमेदवार अधिक निवडून येण्याची क्षमता राखून असणारा असेल तर त्याचाही महायुती विचार करेल. याप्रसंगी गणेश बनकर, राहुल बनकर, अविनाश बनकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
अमोल मिटकरींच्या वक्तव्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, वाचाळवीरांची संख्या सध्या राज्यात वाढत चालली आहे. चुकीचे आणि कायद्याविरोधात बोलणाऱ्यांवर वेळ आली तर कायदेशीर कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही.
काही जण माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. मी कधीही वेशांतर करून कोणालाही भेटायला जात नाही. मला ज्यांना भेटायचे असते, त्या ठिकाणी उघडपणे जातो. ज्यांनी चुकीची बातमी पसरवली त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे. कुठेही काही पुरावा आढळल्यास मी राजकारणातून निवृत्त होईल, असेदेखील पवार यांनी यावेळी आव्हान दिले.
महायुतीच्या तीन घटक पक्षांत एखाद्या विद्यमान जागेबाबत एकमत होत नसेल तर त्यात परस्परांना विश्वासात घेऊन बदल करण्यात येईल. तिघांमध्ये एकमत होऊन जागा समजा 'अ' पद्धतीने सोडली आणि 'ब' पक्षाने स्वीकारली तर त्याबदल्यात 'ब' पक्षानेदेखील एक जागा 'अ' पक्षासाठी सोडली पाहिजे, असे फॉर्म्युल्याचे स्वरूप राहणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.