नाशिक : लहान मुलांच्या हातून लिंबूपाणी घेत आंदोलन मागे घेताना उपोषणकर्ते. समवेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आदी. (छाया : हेमंत घोरपडे) 
नाशिक

Nashik|'आदिवासी जेन झी' मुंबईत धडकणार, तेरा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे; धरणे आंदोलन कायम

राहुल गांधी, अभिजित दीपके, आदित्य ठाकरे यांच्या पाठिंब्याने आंदोलक सरकारला घेरणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ गेल्या १३ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या 'आदिवासी जेन झी' उपोषणकर्त्यांनी शुक्रवारी (दि. ४) उपोषण मागे घेत धरणे आंदोलन कायम ठेवतानाच आता लवकरच थेट मुंबईत 'उलगुलान' मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे, पोलिस उपआयुक्त मोनिका राऊत, माजी आमदार जे. पी. गावित यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.

आदिवासी वसतिगृहातील असुविधा, सेंट्रल किचन रद्द करणे, डोनेशनच्या नावाखाली आदिवासी विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक लूट आणि गेल्या दोन वर्षांत वसतिगृहातील ५९३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यासाठी या विभागाचे मंत्री प्रा. अशोक उईके यांचा राजीनामा घ्यावा, तसेच या विभागाचे सचिव विजय वाघमारे व आयुक्त लीना बनसोड यांना तातडीने हटवावे या मागणीसाठी राहुल पावरा, लक्ष्मी जाधव आणि विवेक गावित तिघांचे बेमुदत उपोषण, तर विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन गत १३ दिवसांपासून सुरू होते.

हे आंदोलन मागे घेण्यासाठी आदिवासी आयुक्तालयाकडून प्रयत्न झाले; मात्र ते निष्फळ ठरले. या उलट आंदोलनाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत गेला. यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांना पाठिंबा देत आंदोलनावर ठाम रहा, मी आंदोलनात उतरतो असे सांगितले. या पाठोपाठ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत उपोषण मागे घ्या, महाविकास आघाडीची ताकद आंदोलनामागे उभे करून देशातील सर्वात मोठे आदिवासींचे आंदोलन उभारण्याची घोषणा केली होती. यातच कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी ही आंदोलनाला पाठिंबा देत, उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेऊन आंदोलन अधिक व्यापक करावे. आंदोलनाची व्याप्ती राज्यभरात वाढवून सकल आदिवासींचा मोर्चा थेट मुंबईला घेऊन आदिवासी विकासमंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडू, असे सांगितले होते

आंदोलनकर्ते म्हणतात...

उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले असले तरी आम्ही मागण्यांवर ठाम असून, आमचे धरणे आंदोलन सुरूच राहील. आदिवासी विकास-मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत उलगुलान महामोर्चा काढण्यात येईल. तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

- प्रशांत गावंडे, आंदोलनकर्ते

जिल्हाधिकारी म्हणतात...

मुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री व पालकमंत्री यांच्या आदेशानुसार आम्ही आदिवासी उपोषणकर्त्या युवकांची भेट घेतली. त्यांच्या मागण्या शासनाकडे पाठवून धोरणात्मक बाबींवर काय उपाययोजना करता येईल, याविषयी तोडगा काढण्याचा प्रयत्न करू.

- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT