नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निवास व्यवस्थेचे नियोजन अंतिम टप्प्यात आणले आहे. विविध शासकीय कार्यालये, पोलिस आस्थापना, धर्मशाळा, ट्रस्टच्या इमारती तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये मिळून ३० हजार ३४० जणांच्या निवासाची क्षमता उपलब्ध करण्यात येणार आहे. यामध्ये ३ हजार २२८ अधिकारी-कर्मचारी, तर तब्बल २७ हजार ११२ अंमलदार व इतरांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे.
सिंहस्थ काळात मोठ्या प्रमाणात पोलिस अधिकारी व अंमलदारांची नियुक्ती होणार असल्यामुळे त्यांच्या निवासाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मंगल कार्यालये, लॉज व धर्मशाळांमध्ये सर्वाधिक २१ हजार ६१४ जणांची निवास क्षमता उपलब्ध आहे. त्यापाठोपाठ नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या बॅरेकमध्ये २ हजार ३००, पोलिस मुख्यालयातील २४ बॅरेकमध्ये १ हजार ९२८, तर पोलिस ठाणे व शाखा रोड क्रमांक ५ येथे ६७८ जणांची व्यवस्था प्रस्तावित आहे.
पांजरापोळ ट्रस्टच्या इमारतींमध्ये ५०० जणांची, तर इतर आवश्यक बांधकाम व दुरुस्तीच्या माध्यमातून ९२ जणांची निवास क्षमता उपलब्ध होणार आहे. इंद्रकुंड येथील मनपा इमारतीत अधिकारी वर्गासाठी ५०, आरोग्य विज्ञान विद्यापीठात ५०, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात १२०, महाराष्ट्र पोलिस अकादमीत १ हजार १४२, तर गुन्हे अन्वेषण विभागाच्या डीटीएस इमारतीमध्ये २०० अधिकाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
१. प्रमुख आव्हान: सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होणार असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणे हे प्रशासनासमोरील प्रमुख आव्हान असणार आहे. गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण, महत्त्वाच्या धार्मिक स्थळांची सुरक्षा, मिरवणुका व स्नानपर्व काळात बंदोबस्त यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे अधिकारी व अंमलदारांच्या निवासाची व्यवस्था त्यांच्या कार्यक्षेत्राजवळ करण्यावर भर देण्यात येत आहे.
२. तत्पर सेवा: निवासाची व्यवस्था योग्य झाल्यास, बंदोबस्तासाठी नियुक्त पोलिसांना वेळेत संबंधित ठिकाणी पोहोचणे शक्य होणार असून, आपत्कालीन परिस्थितीत अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देणेही सुलभ होणार आहे. गर्दीच्या ठिकाणी संभाव्य अनुचित प्रकारांना आळा घालणे, हरवलेल्या व्यक्तींचा शोध, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, संवेदनशील भागात गस्त वाढविणे, यासाठी उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करता येणार आहे.
३. सुरक्षिततेवर भर: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस, महसूल, महापालिका, आरोग्य, वाहतूक आणि इतर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवणे आवश्यक आहे. भाविकांची सुरक्षितता आणि शहरातील दैनंदिन वाहतूक सुरळीत ठेवणे त्याबरोबरच कायदा - सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तैनात करण्यात येणाऱ्या अधिकारी - अंमलदारांना निवास सुविधा उपलब्ध करून देणे, हा बंदोबस्त नियोजनातील महत्त्वाचा भाग आहे.
कुंभमेळ्याच्या कालावधीत देशभरातून भाविक, साधू-महंत तसेच विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे निवास व्यवस्थेवर विशेष भर देण्यात आला असून, उपलब्ध क्षमतेचा योग्य वापर करण्यासाठी नियोजन केले जात आहे.