नाशिक : मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी गँगस्टर अबू सालेमला न्यायालयीन कामकाजानिमित्त गुरुवारी (दि. १) मध्यरात्री रेल्वेने दिल्ली येथे सशस्त्र पोलिस बंदोबस्तात नेण्यात आले. यावेळी बंदोबस्ताची पुरेपूर काळजी घेतल्याचे दिसून आले. तसेच रेल्वेतील बोगी राखीव ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दिल्ली येथील कामकाज झाल्यानंतर सालेमला पुन्हा नाशिक रोड कारागृहात आणण्यात येणार आहे.
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी कुख्यात गँगस्टर अबू सालेम अब्दुल कयुम अन्सारी याला शुक्रवारी (दि. २) सर्वोच्च न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यासाठी त्याला रेल्वेने दिल्ली येथे नेण्यात आले. सालेमच्या सुरक्षिततेसाठी नाशिक शहर पोलिसांचा ४४ अधिकारी-अंमलदारांचा सशस्त्र बंदोबस्त पुरविला आहे. यासह वैद्यकीय पथक, रेल्वे पोलिस व स्थानिक पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त कैदी पार्टीसाठी तैनात आहे. सालेमच्या जिवाला धोका असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्यानुसार गुरुवारी मध्यरात्री त्याला रेल्वेने दिल्ली येथे नेण्यात आले. त्यासाठी रेल्वेतील बोगी राखीव ठेवण्यात आल्याचे समजते. या बोगीची तपासणी श्वान पथक व बॉम्ब शोधक व नाशक पथकाद्वारे करण्यात आली. शुक्रवारी न्यायालयीन कामकाज झाल्यानंतर त्याला पुन्हा नाशिकला आणण्यात येणार आहे.
एक सहायक पोलिस आयुक्त, तीन पोलिस निरीक्षक, तीन सहायक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, पाच हवालदार आणि २७ अंमलदारांचा फौजफाटा कैदी पार्टीत आहे. त्याचप्रमाणे यात दोन कॅमेरामन असून, ते सभोवतालच्या हालचाली टिपणार आहेत. तसेच जलद प्रतिसाद पथकातील 10 सशस्त्र अंमलदारांचाही समावेश आहे.