नाशिक : गेल्या तीन दिवसांतील मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात गोदावरी आणि इतर नद्यांना पूर आला असून, या स्थितीत गुरुवार (दि. २३) पासून ७३ घरांची पूर्णतः किंवा आंशिक पडझड झाली तसेच नदीकाठच्या व सखल भागातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे ८६२ व्यक्तींना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे. काही ठिकाणी डोंगरमाथ्यावरून दगडमाती घसरून तसेच रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ३२ रस्ते बंद केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
जिल्ह्यात मागील तीन दिवसांत जोरदार पावसामुळे गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून, शुक्रवारी (दि. २४) पहाटेच्या सुमारास अहिल्याबाई होळकर पूल येथे गोदावरी नदीपात्रात तब्बल २७ हजार ७४७ क्यूसेकपर्यंत विसर्ग झाल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. शहरातील नदीकाठच्या लो लाइन भागात प्रशासनाने पूर्वीच सावधगिरी बाळगत सुमारे ३० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले. तसेच इगतपुरीतील १५, मालेगाव परिसरातील ७० -सायखेडा त्याचप्रमाणे चांदोरी परिसरातून सुमारे ७३२ अशा सुमारे ८६२ नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थालांतरित केले.
त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, चांदवड आणि कळवण परिसरातही मोठे नुकसान झाले. इगतपुरी - त्र्यंबकेश्वर-पेठ कळवण मार्गावर वीज खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला तसेच २ गावांचा संपर्क तुटला असून, ३ विहिरींचेही नुकसान झाले. दरम्यान, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने समन्वयाने पूरप्रवण भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम वेगाने केले.
हवामान खात्याने पावसात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तविली आहे, तरी प्रशासनाने सतर्कता कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी नदीकाठच्या भागात जाणे टाळावे, अपडेटसाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पूर नियंत्रणासाठी सर्व यंत्रणा २४ तास कार्यरत आहेत.
४५ वृक्ष कोसळले
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील मोठ्या झाडासह जिल्हाभरात विविध ठिकाणी सुमारे ४५ वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या. यात जिल्हाधिकारी कार्यालयातील मोठे झाड परिसरातील वाहनांवर कोसळल्याने तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले. एक कार पूर्णपणे दाबली गेली. सुदैवाने यावेळी वाहनामध्ये कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळल्याची प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शीनी व्यक्त केली.