नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कर्नाटकातील चोरला घाट परिसरात घडलेल्या ४०० कोटी रुपयांच्या नोटांनी भरलेल्या कंटेनर लूट प्रकरणातील मुख्य संशयित किशोर सावळा यास न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
शनिवारी स्वतःहून नाशिक ग्रामीण पोलिसांकडे शरण आलेल्या सावळाला १ फेब्रुवारीस न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यास ३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणात यापूर्वी सहा जणांना अटक करण्यात आली असून, आता मुख्य सूत्रधारही तपासाच्या कक्षेत आल्याने संपूर्ण गुन्ह्याची साखळी उलगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, या घटनेतील अझहर अली हा एकमेव आरोपी अद्याप फरार असून, तो परदेशात पळून गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सावळाकडून पोलिस कोठडीत कोणती महत्त्वाची माहिती मिळते, यावर पुढील तपासाची दिशा ठरणार असल्याचे तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले.
१६ ऑक्टोबरच्या रात्री कर्नाटकातील चोरला घाट येथे नोटांनी भरलेला कंटेनर लुटल्याचा प्रकार नाशिक-घोटी मार्गावर संदीप पाटील यांच्या अपहरणाच्या घटनेतून उघडकीस आला होता. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात संदीप पाटील यांनी जयेश कदम, विराट गांधी यांच्यासह इतर संशयितांची नावे व फोन रेकॉर्डिंगसह तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर ९ जानेवारीस घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अप्पर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. सुरुवातीला अटक झालेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
त्यानंतर मच्छिंद्र मढवी याची आरोपी म्हणून भर पडली असून, अलीकडील सुनावणीत विराट गांधी याची न्यायालयीन कोठडीत रवानगी, तर मढवी याची पोलिस कोठडी वाढवण्यात आली आहे. हा गुन्हा जरी कर्नाटकात घडला असला तरी नाशिकमधील अपहरण प्रकरणातून तो उघडकीस आल्याने कर्नाटक गृहखात्याचेही या तपासाकडे बारकाईने लक्ष आहे. सावळा ताब्यात आल्याने तपासातील अनेक महत्त्वाचे धागेदोरे उघडकीस येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.