नाशिक : नामदेव भोर
जिल्ह्यातील विशेष पुनरीक्षण मोहिमेंतर्गत (एसआयआर) सुमारे ३,७५४ मतदारांनी या संपूर्ण प्रक्रियेलाच नाकारले आहे. या मतदारांनी एन्युमरेशन फॉर्म भरण्यास वा त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने अशा मतदारांचा 'इतर' प्रवर्गात समावेश केला असून, या सर्व मतदारांची नावे प्रारूप यादीतून वगळली आहेत.
जिल्ह्यातील तब्बल १० लाख २७ हजार ८९४ मतदारांची नावे प्रारूप मतदारयादीतून वगळली आहेत. यामध्ये मयत, कायमस्वरूपी स्थलांतरित, दुबार आणि गैरहजर मतदारांसह 'इतर' या प्रवर्गात ३ हजार ७५४ मतदारांचा समावेश आहे.
या मतदारांच्या घरी पोहोचलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) एन्युमरेशन फॉर्म भरण्यास वा त्यावर स्वाक्षरी करण्यास विविध कारणांनी नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या ३ हजार ७५४ मतदारांनी एसआयआर प्रक्रियेत सहभागी होण्यास नकार दिल्याची चर्चा आहे.
जिल्ह्यात एसआयआर प्रक्रियेदरम्यान मतदार यादीच्या पडताळणीचे काम केले. बीएलओnamed घरोघरी जाऊन मतदारांकडून एन्युमरेशन फॉर्म भरून घेतले. या प्रक्रियेत उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यातील मतदारांची नावे विविध कारणांमुळे वगळली. त्यात १ लाख ६७ हजार ५०५ मयत मतदार, ४ लाख ९१ हजार २७३ गैरहजर मतदार, २ लाख ६१ हजार ६५३ कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार आणि १ लाख ३ हजार ७०९ दुबार मतदारांचा समावेश आहे.
याशिवाय ३ हजार ७५४ मतदार 'इतर' प्रवर्गात आहेत. या मतदारांपर्यंत बीएलओ पोहोचले असता, त्यांनी विविध कारणांमुळे एन्युमरेशन फॉर्म भरण्यास किंवा त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांची नावेही एसआयआरच्या प्रक्रियेत पडताळणीअभावी वगळली आहेत. विशेष म्हणजे, 'इतर' प्रवर्गातील ही संख्या तुलनेने कमी असली, तरी तिचे स्वरूप वेगळे आहे.
मयत, स्थलांतरित वा दुबार मतदारांची नावे वगळण्यामागे स्पष्ट कारणे असताना, फॉर्म भरण्यास किंवा स्वाक्षरी करण्यास नकार देणाऱ्या मतदारांची नावे कोणत्या कारणांमुळे वगळली, याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे. संबंधित मतदारांनी प्रशासनाकडे आपली बाजू मांडल्यास त्यांची नावे पुन्हा समाविष्ट होण्याची संधी आहे का, याकडेही लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात एसआयआरअंतर्गत वगळलेल्या एकूण १० लाख २७ हजार ८९४ मतदारांपैकी ३ हजार ७५४ मतदारांची नावे 'इतर' कारणांमुळे वगळली गेली आहेत. त्यामुळे मतदार यादीतील या प्रवर्गाची स्वतंत्र छाननी आणि त्यामागील कारणांची स्पष्टता महत्त्वाची ठरणार आहे.
एसआयआरनंतर प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदारयादीबाबत दावे-हरकती दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे वगळलेल्या मतदारांना आपले नाव पुन्हा मतदारयादीत समाविष्ट करण्यासाठी निर्धारित प्रक्रियेनुसार दावा दाखल करता येणार आहे. परिणामी, अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होईपर्यंत वगळलेल्या मतदारांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे.