नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.13) रोजी जाहीर झाला असून, यंदाही नाशिक विभागात मुलींनीच बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत 94.64 टक्के मुली तर 90.67 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. यंदा विभागाचा निकाल 93.04 टक्के इतका लागला असून, राज्यात नाशिक विभाग पाचव्यास्थानी आहे.
नाशिक विभागातून 1 लाख 98 हजार 707 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली हाेती. त्यातील 1 लाख 97 हजार 14 विद्यार्थी परीक्षेला बसले. पैकी 1 लाख 83 हजार 305 उत्तीर्ण झाले. यातील 74 हजार 637 मुलांनी 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले तर 68 हजार 638 विद्यार्थ्यांनी 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. 45 टक्क्यांच्या पुढे 33 हजार 886 तर 35 टक्क्यांच्या पुढे 6 हजार 144 विद्यार्थ्यांनी गुण मिळविले. इयत्ता अकरावीचे वर्ग लवकर सुरू होत असल्याने तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेण्याच्या दृष्टीने यावर्षी इयत्ता दहावीची परीक्षा दहा दिवस अगोदर मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दु, कन्नड, सिंधी व तेलगू या आठ भाषांमध्ये आयोजित करण्यात केली होती.
यंदा राज्यातील 9 विभागांतून 15 लाख 58 हजार 20 विद्यार्थ्यांपैकी 8 लाख 30 हजार 309 मुले तर 7 लाख 27 हजार 711 मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. पैकी 8 लाख 23 हजार 611 मुले तर 7 लाख 22 हजार 968 मुली परीक्षेस प्रविष्ट झाल्या. एकूण विद्यार्थ्यांपैकी 7 लाख 60 हजार 325 मुले तर 6 लाख 95 हजार 108 मुली पास झाल्या. 14 लाख 55 हजार 433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, राज्याचा निकाल 94.10 टक्के लागला आहे.
यंदा 28 हजार 512 विद्यार्थ्यांनी 17 नंबरचा फॉर्म भरला होता. यातील 22 हजार 518 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, 80.36 टक्के निकाल लागला. 24 हजार 376 विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेचा फॉर्म भरला होता. पुनर्परीक्षार्थींचा निकाल 39.44 लागला असून, एकूण 9 हजार 448 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नियमित, खासगी व पुनर्परीक्षार्थी असे एकूण 16 लाख 10 हजार 908 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यातील 14 लाख 87 हजार 391 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, सर्वांचा एकत्रित निकाल 93.04 टक्के लागला आहे.
यंदा बारावीप्रमाणे दहावीतही कोकण विभागानेच प्रथम क्रमांक मिळविला. कोकण विभागातून 26 हजार 861 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील 26 हजार 546 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण विभागाचा एकूण निकाल 92.82 ट़क्के लागला, तर कोल्हापूरने दुसरा क्रमांक मिळविला. कोल्हापूरमधून एकूण 1 लाख 29 हजार 421 विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी 1 लाख 25 हजार 380 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोल्हापूरचा निकाल 96.87 टक्के लागला. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 90.78 टक्के लागला.
मार्च 2024 मध्ये इयत्ता दहावीचा निकाल 95.81 टक्के लागला होता. यंदा 94.10 टक्के निकाल लागला असून, 1.71 टक्क्यांनी घसरला आहे. मार्च 2022 मध्ये 96.14 तर मार्च 2023 मध्ये 93.83 टक्के निकाल लागला होता.
राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 9 हजार 585 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 92.27 टक्के अर्थात 8 हजार 844 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्वच थरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
यंदा नाशिक विभागातून 1 लाख 97 हजार 14 विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यातील 1 लाख 83 हजार 305 विद्यार्थी उत्तीर्ण तर 13 हजार 709 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै महिन्यात माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात येणार असून, त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती नाशिक विभागीय शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.