सोलापूर : सुमित वाघमोडे
राज्यातील सर्वात मोठ्या आषाढी वारीसाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. पालखी मार्गासह आषाढी वारीत दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. त्यांच्या सोबतीला सीसीटीव्ही, ड्रोन, वॉकीटॉकीसह इतर अत्याधुनिक साधने राहणार आहेत. प्रशासनाच्या वतीने एकच कंट्रोल रुम उभारण्यात आली असून त्याद्वारे सर्व विभागांना नियंत्रित करण्यात येणार आहे.
यंदाच्या वारीत एअर अँम्बुलन्सची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. आषाढी वारीत सुमारे २५ लाखांपेक्षा अधिक वारकरी पंढरपुरात दाखल होतात. त्यांच्या सुरक्षेसाठी १० हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही ड्रोन आणि एआयची मदतही घेतली जाणार आहे. त्याचबरोबर बीडीडीएस पथकही तैनात करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यासह ठाणे, धाराशिव, सातारा, सांगली, परभणी, पुणे सिटी, लातूर यासह इतर जिल्ह्यातील बीडीडीएस पथक वारीत तपासणी करीत आहे. एका बीडीडी पथकात एका श्वानासह एक हँडलर, दोन टेक्निशियन आणि इतर पोलीस मदतीला राहणार आहेत. या टीमला वेगवेगळ्या ठिकाणी तपासणीसाठी ठेवण्यात आले आहे.
आषाढी वारीत संपूर्ण यंत्रणेवर एकाच कंट्रोल रुमच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस व जिल्हा प्रशासनाचे काम सोपे झाले आहे. एआय आधारित ड्रोन, अँन्टी ड्रोन, वॉकीटॉकी, बायनाक्युलर, ५ जी स्मार्टफोन या अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात येणार आहे. गर्दीवर नियंत्रणासाठी होल्ड अँण्ड रिलीज टेकनिक वापरण्यात येणार आहे. वाळवंट, महाद्वार, नामदेव पायरी, चौफाळा, पालखी तळ, रिंगण सोहळा याठिकाणी वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत.
"आषाढी वारीसाठी सुमारे १० हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. वारीसाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्यात आले आहे. एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी तसेच ग्राम सुरक्षा यंत्रणा, स्वयंसेवक यांची मदत घेतली जाणार आहे. अत्याधुनिक यंत्रणा उभारून वारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कंट्रोल रुम उभारली आहे. सुरक्षित वारी करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
आषाढीसाठी पंढरपुरात लाखो भाविक वाहनाद्वारे येतात. वेगवेगळ्या मार्गावरून येणाऱ्या वाहनांसाठी त्याच मार्गावर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी क्यूआर कोड देण्यात आला आहे. तो स्कॅन केल्यावर आपण कोणत्या मार्गावरून येणार आहोत, तिथे ट्रॅफिकची समस्या आहे का, पार्किंग कुठे करावे, याची माहिती मिळणार आहे.
पालख्यांसोबत तसेच पंढरपुरात आषाढी वारीत लाखो भाविक येत असतात. त्यातील लहान मुले, वृद्ध अनेकदा बेपत्ता होतात. नातेटगोइकांपासून वेगळे झाल्यानंतर त्यांना शोधून त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचवणे, कोणाचे सामान गहाळ झाले, चोरी झाली त्याची नोंद घेणे यासाठी २५ पोलीस मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामध्ये महिला पोलिसांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्ह्यात दोन्ही महत्त्वाच्या पालख्यांचे आगमन झाल्यानंतर पालखी तळ, मुक्काम विसावा, रिंगण सोहळा, मंदिर परिसर, वाळवंट तसेच पंढरपूर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. एक पोलीस अधिकारी व अंमलदार त्या वॉच टॉवरवर असणार आहेत. त्यांच्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानासह वॉकीटॉकी, ५ जी फोन, दुर्बीण असणार आहे. गर्दीवर नियंत्रण, चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी प्रयत्न करणे, रिंगण सोहळा अथवा गर्दीच्या ठिकाणी चेन स्नेचिंग, पाकिटमार यांच्यावर ते नजर ठेवणार आहेत.
मानांच्या प्रमुख दोन पालख्यांसोबत दीड ते दोन हजार वाहने असतात. यामध्ये वॉटर टँकर, टॉयलेट टँक, चारचाकी वाहनांचा समावेश असतो. अशा वाहनांना पासेस देणे, क्यूआर कोडद्वारे वाहनांची नोंदणी करणे, त्यांना रस्ता मोकळा करून देणे यासाठी गामा कमांडो फोर्स तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर वारीकातला ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी त्यांची नियुक्ती केली आहे. काम गामा कमांडो १२० दुचाकीवर तैनात राहणार असून त्यांच्याकडे मेगा फोन, वॉकीटॉकी व ५ जी फोन असणार आहे. त्यांच्या दुचाकीवर जीपीएस सिस्टीम लावण्यात आली असून ते कुठे आहेत, ते कंट्रोल रुममध्ये कळणार आहे. संत ज्ञानेश्वर पालखित २७० तर संत तुकाराम महाराज पालखीसोबत १८० गामा कमांडो असणार आहेत. १२० दुचाकी, एक मेगा फोन, ५ जी फोन, वॉकीटॉकी दिलेले आहेत.