नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेच्या कर्मचारी आणि अधिकारी यांना नवीन ओळखपत्र दिले जाणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी दिली आहे. यावेळी ओळखपत्र बाह्यस्रोताकडून न घेता जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिले जाणार आहेत. नवीन वर्षात मुख्यालयातील ५००, तर ग्रामीण भागातील १५ हजार कर्मचाऱ्यांना ओळखपत्र मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
दरम्यान, कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू झाल्यानंतर ओळखपत्र दिले जाणार आहे. गेल्या वर्षी नोकरीसाठी बनावट नियुक्तिपत्रे देण्याबाबत रॅकेट उघडकीस आले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने बाह्यस्रोताचे सर्व परवाने रद्द करत ओळखपत्रे देण्याबाबत स्वत:हून पुढाकार घेतला होता.
आता कर्मचाऱ्यांचे सद्यस्थितीतील ओळखपत्र रद्द होणार असून, नवीन ओळखपत्र सामान्य प्रशासन विभागातर्फे दिले जाणार आहेत. ओळखपत्राच्या अंतिम नमुन्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, सामान्य प्रशासन विभागाकडून हे ओळखपत्र तयार केले आहे. आता लवकरच संबंधित विभागप्रमुखांकडून त्यांचे वितरण होईल. पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी यांच्यामार्फत देण्याबाबत विचारविनिमय सुरू असून, त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.