नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या 25 वर्षांपासून महापालिकेचे प्रतिनिधीत्व करणारे महापौर सतीश कुलकर्णी यांनी आपल्या शेवटच्या महासभेत यापुढे आपण महापालिका निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केली. नाशिक शहरासाठी शहर बससेवा तसेच निओ मेट्रो, आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क, नमामि गोदा यासारखे महत्वाकांक्षी प्रकल्पांची पायाभरणी महापौरपदाच्या कारकीर्दीत झाल्याचे समाधान महापौरांनी व्यक्त केले.
महापौर कुलकर्णी यांच्या कार्यकाळातील शेवटची महासभा गुरूवारी(दि.10) ऑनलाईन पार पडली. यावेळी त्यांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे आभार मानले. कोणताही पक्षभेद न करता सर्वांना सोबत घेत रस्ते,
शहर बससेवा, जलकुंभ, पाईपलाईन, ड्रेनेज अशी कामे करून शहर विकासाला चालना दिली. भाजपने दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केल्याचे सांगताना महापौर कुलकर्णी काहीसे भावूक झाले.
मनुष्यबळाची कमतरता आणि उत्पन्नाचे स्त्रोत कमी असूनही अनेक विकास कामे केली. आयटी हब, बीओटी, लॉजिस्टिक पार्क यासारख्या प्रकल्पांतून महापालिकेला सुमारे दीड हजार कोटींचे वार्षिक उत्पन्न मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पक्ष संघटनेचे
काम करणार
आगामी काळात येणार्या लोकप्रतिनिधींचा सभागृहात सहवास लाभणार नाही, अशी खंत व्यक्त करत महापौर कुलकर्णी यांनी यापुढील काळात पक्ष संघटनेसाठी काम करणार असल्याचे सांगितले. पक्षाने आपल्याला खूप काही दिले आता पक्ष देईल ती जबाबदारी स्विकारेन, असे जाहीर करत आपला वारसदार कन्या संध्या कुलकर्णी की पुत्र वैभव कुलकर्णी यापैकी पक्ष उमेदवारी देईल तो असेल असे त्यांनी नमूद केले.