उत्तर महाराष्ट्र

नाशिक : बहुउपयोगी बांबूची शेती फायदेशीर : राज्यपाल

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बांबूची शेती बहुउपयोगी असून, ती शेतकऱ्याला फायदेशीर ठरणारी असल्याने बांबू शेतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शासनासोबत जनतेनेही पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

तालुक्यातील लाखलगाव येथील दाते बांबू नर्सरीला राज्यपाल कोश्यारी यांनी गुरुवारी (दि. १) भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आत्माराम दाते, प्रशांत दाते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, कोरडवाहू नापीक जमिनीवर बांबूचे पीक घेता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू शेती करण्यासाठी पुढे यावे. दिवसेंदिवस बांबूचे महत्त्व वाढत आहे. आज बऱ्याच ठिकाणी प्लास्टिकऐवजी बांबूच्या पेल्याचा उपयोग केला जातो. बांबूच्या पानांपासून अनेक खाद्यपदार्थ तयार करण्यात येतात. बांबूचे अनेक उपयोग होत असल्याने शेतकऱ्यांनी बांबू शेती करून त्यामध्ये नवनवीन प्रयोग राबवावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच नवनवीन प्रयोग राबविताना त्यामध्ये शासन, सामाजिक संस्थांचा सहभाग घ्यावा, असेही कोश्यारी यांनी सांगितले. यावेळी राज्यपालांनी 96 प्रकारच्या विविध बांबू प्रजाती असलेल्या नर्सरीची व बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंची पाहणी केली.

बांबू क्लस्टरचा विकास करावा : झिरवाळ

बांबूची शेती अतिशय उपयोगी व फायदेशीर आहे. आदिवासी भागात बांबू शेतीचा अधिक प्रचार व प्रसार होण्यासाठी शासनाच्या पारंपरिक मार्गदर्शक सूचना बदलणे आवश्यक आहे. नवीन मार्गदर्शक सूचना तयार करण्यात याव्यात. जेणेकरून बांबू क्लस्टरचा विकास करण्यात येईल, असे मत ना. नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT