नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या आमदारकीला 100 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याबद्दल सर्वेक्षण केले. यात मतदारांनी सहभागी होत युवकांचे प्रश्न, बेरोेजगारी व जुन्या पेन्शनसाठी नव्या उपाययोजना राबविण्याचे मत व्यक्त केले. यावेळी 87.15 टक्के मतदारांनी आ. तांबे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून तांबे यांनी देशभरातील लोकप्रतिनिधींपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
लोकशाहीत मतपेटीच्या मार्गाने निवडून आलेला प्रत्येक नेता हा लोकांना उत्तरदायी असतो असे म्हणतात. आ. तांबे यांनी मात्र हे वचन आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आलेल्या तांबे यांनी आपल्या आमदारकीचे 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर एक सर्वेक्षण घेतले. त्याआधी त्यांनी 100 दिवसांत केलेल्या कामाचा लेखाजोगा मतदारांसमोर मांडला. यावेळी तांबे 21 मे रोजी समाजमाध्यमांवरून या वेबसाइटच्या लोकार्पणाची घोषणा केली. तसेच लोकांनी 25 ते 30 मे पर्यंत सर्वेक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते. संकेतस्थळावर आ. तांबे यांच्याबद्दलची माहिती, त्यांनी केलेल्या कामांचा आढावा, आगामी वेळापत्रक, त्यांच्याबद्दल प्रसिद्ध झालेल्या बातम्या, अशा गोष्टी त्यांनी उपलब्ध करून दिल्या. या वेबसाइटवर सर्वेक्षणाची लिंकही देण्यात आली होती. आमदारकीच्या पहिल्या 100 दिवसांबाबत लोकांची काय प्रतिक्रिया आहे, कामे लोकांपर्यंत पोहोचली आहेत का, काही सूचना करायच्या आहेत का, अशा सर्वच बाबींची दखल घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले.
सर्वसाधारण कोणत्याही मोठ्या कंपनीत दर तीन महिन्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या कामाचा आढावा घेतला जातो. एखादा कर्मचारी किंवा अगदी उच्चपदावरील अधिकारी कुठे कमी पडतो, कोणत्या- कोणत्या ठिकाणी जास्त प्रयत्नांची गरज आहे, कुठली कामं उत्तम होत आहेत, हे त्यातून समोर येत असते. त्यामुळे सुधारणेला वाव मिळतो. राजकीय क्षेत्रात तर लोकप्रतिनिधीही लोकांना उत्तरदायी असतात. त्यामुळे असे सर्वेक्षण व्हायलाच हवे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून लोकांनी केलेल्या सूचनांचा आता गंभीरपणे विचार करून त्याकडे लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न असेल. – सत्यजित तांबे, आमदार, नाशिक पदवीधर मतदारसंघ.
आ. तांबे देशात पहिले!
एखादा राजकीय नेता निवडून आल्यानंतर थेट पुढच्या निवडणुकीच्या वेळी मतदारांसमोर आपण केलेल्या कामाचा आढावा घेऊन जातो. क्वचित केंद्र किंवा राज्य सरकार पहिल्या सहा महिन्यांचा लेखाजोखा लोकांसमोर मांडत असतात. पण एखाद्या नेत्याने निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत मतदारांना आपल्या कार्यपद्धतीबद्दल समाधान वाटत आहे अथवा नाही, हे चाचपण्यासाठी सर्वेक्षण केल्याची ही देशातली पहिलीच वेळ आहे.
मतदार म्हणतात…
एखाद्या आमदाराने ठराविक काळानंतर सतत मतदारांकडून आपल्या कार्यपद्धतीबद्दल मूल्यमापन करून घ्यावे, ही पद्धत चांगली आहे. राजकारणी मंडळी कायमच लोकांना गृहीत धरत आले आहेत. एकदा निवडून आले की, ते पुन्हा पाच वर्षें मतदारांना तोंड दाखवत नाहीत. मात्र आ. तांबे यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. त्यांनी ही मोहीम पुढेदेखील कायम ठेवावी. – शैलेंद्र खडके, पदवीधर मतदार, जळगाव.
नगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांसह इतरही काही ठिकाणच्या तब्बल 11 हजार 620 लोकांनी सर्वेक्षणात सहभाग घेतला. विशेष म्हणजे यापैकी 87.15 टक्के मतदारांनी तांबे यांच्या आतापर्यंतच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. 6.25 टक्के लोकांनी काम बरे असल्याचे नमूद केले. उर्वरित 6.6 टक्के लोकांनी कामात सुधारणा व्हावी, असे मत नोंदविले.