नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा : आमदार अमोल मिटकरी यांनी लग्न सोहळ्यातील श्लोकाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद मनमाड शहरातही उमटले असून ब्राह्मण समाजाने आक्रमक भूमिका घेत श्री परशुराम प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले.
यावेळी संतप्त आंदोलकांनी आ. मिटकटी यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करीत पोलिस अधिकारी आणि मंडल अधिकार्यांना निवेदन देत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. एका कार्यक्रमात आ. मिटकरी यांनी लग्न सोहळ्यात पुरोहितांकडून म्हटल्या जाणार्या श्लोकाबाबत वादग्रस्त विधान केले होते. याबाबत आ. मिटकरींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. महात्मा गांधी चौकात धरणे आंदोलन करीत निषेध नोंदविण्यात आला. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनाही निवेदन देण्यात आले. आंदोलनाला भाजप आणि व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला होता. आंदोलनात समीर कुलकर्णी, युवराज बळेल, स्नेहल भागवत, विनया पाठक, वैभव पाठक, सतीश शेेकदार, प्रकाश कुलकर्णी, सुहास मटकर, सुषमा तिवारी, उमेश कुलकर्णी, आशुतोष गाडगीळ आदी उपस्थित होते.