Hailstorm in Nandurbar
नंदुरबार : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असतानाच गुरूवारी (दि. २) पुन्हा एकदा नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागासह शहराला वादळी पाऊस आणि गारपीटीने अक्षरशः झोडपून काढले. काही ठिकाणी झाडे व विद्युत खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार ३० व ३१ मार्च रोजी तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली होती. या तडाख्यात कांदा, गहू, हरभरा आणि टरबूज पिकांचे मोठे नुकसान झाले. गारपीट व वादळी वाऱ्यामुळे उभे असलेले गहू तसेच काढणी करून ठेवलेला हरभरा व गहू खराब झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
दरम्यान, नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा सुरू असतानाच गुरुवारी दुपारी तीननंतर पुन्हा वादळी पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि प्रचंड धुळीच्या वाऱ्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. सायंकाळी पाचनंतरही पुन्हा पावसाने जोर धरला.
नंदुरबार शहरात चक्रीवादळासारखा वारा सुटल्याने धूळमातीचे लोट उसळले. काही ठिकाणी गारपीटही झाली. अनेक घरांचे पत्रे उडाले, तर रस्त्यांवर झाडांच्या फांद्या कोसळल्या. सुमारे पाऊण तास सुरू असलेल्या या पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले.
वादळी पावसामुळे काही ठिकाणी वीजतारा व खांब तुटल्याने दुपारी तीन वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला होता. बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात नागरिकांची एकच धावपळ उडाली.
चौपाळे, वावद, शनिमांडळ, रनाळे आदी भागांतील पिकांनाही या पावसाचा फटका बसल्याची माहिती मिळत आहे. तहसीलदार प्रदीप पवार व आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाशी संपर्क साधला असता, अद्याप जीवितहानीची माहिती नसून मोठ्या नुकसानीबाबतही अधिकृत अहवाल प्राप्त झालेला नसल्याचे सांगण्यात आले.