जळगाव : संत मुक्ताईंच्या ३२८ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी यंदा प्रथमच भव्य, अत्याधुनिक आणि चांदीने सजविलेल्या नव्या रथाचा वापर करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन रथ देण्याची केलेली घोषणा यंदा पूर्ण झाली असून हा रथ संत मुक्ताई मंदिर संस्थानच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
सागवानी लाकडापासून तयार करण्यात आलेल्या या रथाचे वजन सुमारे १८ क्विंटल असून त्यावर जर्मन सिल्व्हर आणि चांदीचा पत्रा बसविण्यात आला आहे. रथात सीसीटीव्ही कॅमेरे, अत्याधुनिक ध्वनी व्यवस्था आणि विविध सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या मातोश्री स्व. गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा भव्य रथ मंदिर संस्थानला अर्पण केला आहे. या नव्या रथातून संत मुक्ताईंची पालखी बुधवारी मूळ मंदिरातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. पालखीचा पहिला मुक्काम नवीन संत मुक्ताई मंदिर येथे असेल.
वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी २४ तास रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथक उपलब्ध राहणार आहे. तसेच स्वच्छतेसाठी २०० मोबाईल शौचालये आणि पिण्याच्या पाण्यासाठी सहा मोठे टँकर सोबत असतील.
ही पालखी जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव आणि सोलापूर अशा सहा जिल्ह्यांतून २८ दिवसांचा सुमारे ६०० किलोमीटरचा पायी प्रवास करणार आहे. २२ जुलै रोजी पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार असून आषाढी एकादशीपर्यंत संत मुक्ताई मठात विसावणार आहे. या भक्तिमय सोहळ्यात १२५ नोंदणीकृत दिंड्या आणि हजारो वारकरी सहभागी होणार असल्याची माहिती मंदिर संस्थानकडून देण्यात आली.