Jalgaon BJP Shiv Sena NCP Rift  Pudhari
जळगाव

Jalgaon Politics | महायुती फक्त निवडणुकीपुरतीच? निकाल लागताच भाजपचे 'एकला चलो रे'; रक्षा खडसेंच्या बॅनरवरून मित्रपक्ष गायब

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या अभिनंदनाच्या बॅनरमध्ये केवळ भाजपच्या विजयी उमेदवारांचा उल्लेख करण्यात आल्याने नव्या चर्चांना उधाण

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon BJP Shiv Sena NCP Rift

नरेंद्र पाटील

जळगाव : विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीतील अंतर्गत समन्वयाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या अभिनंदनाच्या बॅनरमध्ये केवळ भाजपच्या विजयी उमेदवारांचा उल्लेख करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतील मित्रपक्षांबाबत भाजपची भूमिका काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील समन्वयावर विविध स्तरांवर चर्चा सुरू असतानाच नाशिक आणि जळगावमधील राजकीय घडामोडींनीही या चर्चेला अधिक चालना दिली आहे. जळगावमध्ये भाजपने बंडखोरी रोखून आपला उमेदवार विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे बोलले जात असताना, नाशिकमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेल्या शिवसेना (शिंदे गट) उमेदवाराला अपेक्षित पाठबळ मिळाले नसल्याची टीका केली जात आहे. या घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

दरम्यान, निकालानंतर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सोशल मीडियावर विजयी उमेदवारांचे अभिनंदन करणारा बॅनर प्रसिद्ध केला. या बॅनरमध्ये "भाजपाच्या विधान परिषदेवर विराजमान झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांना शुभेच्छा" असा उल्लेख करण्यात आला असून 'महायुती' किंवा इतर घटक पक्षांच्या विजयी उमेदवारांचा उल्लेख नसल्याने त्यावरून राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

महायुतीमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हेही सत्तेत सहभागी असून त्यांच्या उमेदवारांचाही या निवडणुकीत विजय झाला आहे. मात्र, अभिनंदनाच्या संदेशात त्यांचा समावेश नसल्याने मित्रपक्षांमध्ये नाराजीची भावना निर्माण होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

विरोधकांनी या मुद्द्यावरून भाजपवर मित्रपक्षांकडे दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. निवडणुकीच्या काळात महायुतीचा प्रचार केला जातो, मात्र निकालानंतर भाजप स्वतंत्र भूमिका घेत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.

दरम्यान, या टीकेवर भाजप किंवा केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे बॅनरमागील नेमका हेतू काय होता, हे स्पष्ट होणे बाकी आहे. मात्र, या प्रकरणामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील समन्वय आणि राजकीय समीकरणांबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT