जळगाव : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 चे चौपदरीकरण 95 टक्के पूर्ण केलेले आहे. या मार्गावर असलेल्या ओव्हर ब्रिज वरील पावसाचे पाणी निचऱ्यासाठी लावण्यात आलेले पाईपच चोरीला गेल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी छिद्रांद्वारे सर्विस रोड व ओवर ब्रिजच्या भिंतीमध्ये आणि ब्लॉकमध्ये मुरत (शिरत) आहे. त्यामुळे भविष्यात ओव्हर ब्रिजला संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाळा सुरू असताना मात्र भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) अधिकारी व अभियंता धोकादायक रस्त्यााकडे सर्राणपणे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसाचे पाणी सर्विस रोडवर पडत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना अडचणीचे ठरत आहे.
जळगाव जिल्ह्यामधील पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हा मुंबई ते थेट नागपूरपर्यंतचा वाहतुकीसाठी असलेला महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गाचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) तरसोद ते चिखली हा मार्ग चौपदरीकरण करण्यात आलेला आहे. या चौपदरीकरण झालेल्या महामार्गावर जळगाव मधील तरसोद पासून ओव्हर ब्रिज टाकण्यात आलेला आहे. नशिराबाद ,बादली रेल्वे मार्ग, गोदावरी हॉस्पिटल ,साकेगाव ,भुसावळ येथील ग्रामीण रुग्णालय , रेल्वे लाईन ,नाहाटा कॉलेज चौफुली, खडका रोड चौफुली, सुंदर नगर समोर, त्यानंतर लाल मंदिर तेथून पुढे दिपनगर येथील रेल्वे लाईन या ठिकाणी ओव्हर ब्रिज टाकण्यात आलेला आहे.
वाहतुकीला कुठेही अडथळा होऊ नये व थेट वाहतूक सुरळीत होण्यासाठी ओव्हर ब्रीज निर्माण करण्यात आलेला आहे. या ओव्हर ब्रिजवर पावसामुळे पडणारे पाणी साचून त्यासाठी ओव्हर ब्रिजला छिद्रे ठेवण्यात आलेली असून त्या मार्गे पाईप लावून पाणी सर्विस रोडवर काढण्यात आलेले आहे. मात्र कॉलेज चौफुली पासून ते खडका रोड चौफुली पर्यंतचे रस्त्यावरील ओव्हर ब्रिज रस्त्यावरचे पाणी काढण्यासाठी असलेले पाईप गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
त्यामुळे पावसाचे पाणी हे सर्विस रोडवर थेट पडत असल्याने जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांना व नागरिकांना अडचणीचे ठरत आहे तसेच ओव्हर ब्रिज मध्ये लावणात आलेल्या ब्लॉकमध्ये पाणी मुरत आहे. अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून जिल्ह्यात नियमित संततधारेने पाऊस सुरूच आहे. संततधारेच्या पावसाने या ठिकाणी पाणी मुदत असल्याने पूलाला धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी व अभियंत्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी सुज्ञ मागणी नागरिकांकडून होत आहे.
ओव्हर ब्रीजच्या बाजूला पाणी काढण्यासाठी लावलेले पाईप चोरीला गेले आहेत. या ठिकाणी आता फ्लेक्झिबल पाईप एक ते दोन दिवसात लावण्यात येतील व त्याची दक्षता स्वतः जातीने घेणार आहे.रुपेश गायकवाड भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अभियंता, बांधकाम विभाग, जळगाव