Tarsood Paldhi Bypass Mother Son Accident
जळगाव: हजार कोटी रुपये खर्चून तयार केलेला तरसोद ते पाळधी बायपास रस्ता ३० आणि ३१ जुलैरोजी झालेल्या पावसामुळे बायपासवरील ROB चे स्ट्रक्चर कोसळल्याने ही अवजड वाहतूक पुन्हा जळगाव शहरातून वळवण्यात आली. या अघोरी निर्णयाला सहा दिवस पूर्ण होत नाहीत. तोच, जळगाव शहरातील हॉटेल दरबार आणि सीएनजी पंपासमोर खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण अपघातात मंगला अर्जुन माळी (वय ५५, रा. पिंप्राळा) या महिला भाजी विक्रेत्याचा भरधाव टँकरखाली चिरडून जागीच मृत्यू झाला.
या अपघातात त्यांचा मुलगा भरत माळी (वय २९) हा जखमी झाला आहे. पहिल्याच पावसात कोसळणारा हजार कोटींचा रस्ता आणि शहरातील रस्ता खरडून ठेवणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नाकर्तेपणामुळेच हा अपघात झाला असल्याचा तीव्र संताप जळगावकरांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगला माळी या नेहमीप्रमाणे मुलगा भरतसोबत दुचाकीने पिंप्राळा येथील आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीसाठी जात होत्या. हॉटेल दरबारसमोर आधीच रस्ता खरडून ठेवल्याने पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यातून वाट काढताना मागून आलेल्या भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेमुळे मंगलाबाई रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि टँकरचे चाक त्यांच्या अंगावरून गेले. अपघातानंतर नराधम टँकर चालकाने पाळधीच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र, उपस्थित नागरिकांनी धाडस दाखवून पाठलाग करत आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटलसमोर टँकर अडवून चालकाला एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले.
'हजार कोटींचा रस्ता पहिल्याच पावसात कसा कोसळतो?' आणि 'अनेक दिवसांपासून शहरभरातील रस्ता खरडून ठेवून नागरिकांच्या जिवाशी खेळणारे अधिकारी निवांत कसे?' असा खरमरीत सवाल आता नागरिक विचारत आहेत.
या अपघाताला केवळ टँकर चालकच नाही, तर निकृष्ट दर्जाचा बायपास बनवणारे कंत्राटदार आणि शहरातील रस्ता दुरुस्त न करणारे महामार्गाचे अधिकारी तितकेच जबाबदार आहेत. प्रशासकीय दिरंगाईमुळेच एका कष्टाळू आईचा बळी गेल्याचा आरोप करत, महामार्गावरील खड्डे तातडीने न बुजवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नातेवाईक आणि नागरिकांनी दिला आहे.