जळगाव: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यातील युतीची अधिकृत घोषणा होताच, त्याचे पडसाद जळगावच्या राजकारणातही उमटले. या युतीच्या स्वागतासाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जळगावात एकत्र आले आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा केला.
राज्यात युतीची घोषणा जाहीर होताच, जळगावातील आकाशवाणी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मनसे आणि उबाठा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांच्यासह उबाठा गटाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून आनंद व्यक्त करण्यात आला.
कधीकाळी कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. आता बदल घडणारच, राज–उद्धव एकत्र, महाराष्ट्र होणार मजबूत अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्येही राज–उद्धव युतीचे स्वागत होत असून, आगामी निवडणुकांमध्ये ही युती सत्ताधाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरेल, अशी चर्चा आहे.
निवडणुकीचे गणित बदलणार?
जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत या युतीमुळे चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठी मतांचे विभाजन थांबेल, तसेच मनसेची आक्रमक भूमिका आणि उबाठा गटाची संघटनात्मक ताकद एकत्र आल्यास विरोधकांना कडवी झुंज द्यावी लागेल, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. राज्यात झालेली ही युती ऐतिहासिक आहे. जळगाव जिल्ह्यातही आम्ही एकदिलाने काम करू. ही युती परिवर्तनाची नांदी ठरेल, असे मनसेचे जळगाव जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांनी सांगितले.