Lightning Strike Farm Jalgaon
जळगाव : रावेर तालुक्यातील पालनजीक गावखर्डी धरण परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसात एक दुर्देवी घटना घडली. शेतात काम करत असताना वीज कोसळून गणेश आप्पा बिलाला (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला.
रविवारी दुपारी किया परिसरात जोरदार वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु होता. दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास गणेश बिलाला आपल्या शेतात काम करत होते. त्याच वेळी अचानक विजांचा कडकडाट झाला आणि वीज थेट त्यांच्या अंगावर कोसळली. माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ तत्काळ घटनास्थळी पोहोचले. परंतु तोपर्यत गणेशचा जागीच मृत्यू झालेला होता.
गणेश आप्पा बिलाला यांच्यामागे पत्नी, चार मुले आणि एक मुलगी असा मोठा परिवार आहे.गणेश हे कुटुंबातील एकमेव कमावते होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे त्यांच्या कुटुंबाला तातडीची मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.
रावेर तालुका प्रशासनाने घटनेची नोंद घेतली आहे, कृषी विभाग व महसूल विभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
प्रशासनाकडून तातडीची मदत जाहीर करण्याची मागणी
स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले की, अवकाळी पावसासह विजांचा कडकडाट हा शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. शासनाने अशा घटनांमध्ये तातडीने मदत जाहीर करावी, तसेच शेतकऱ्यांसाठी विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.